मोदी गॅरेंटी फसवी अन् खोटी, अजिबात मत देऊ नका; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘मोदी गॅरेंटी खोटी आहे. भाजपने मोदी गॅरेंटी घेत गहू आणि तांदळाबाबत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. आता शेतकऱ्यांची वेळ आहे. आता आमदार, खासदार, मुख्यमंत्री किंवा भाजपचे नेते मत मागायला आले तर त्यांच्या हातात मूठभर गहू, मूठभर तांदूळ द्या आणि सांगा आधी आश्वासन पूर्ण करा. दिलेले आश्वासन त्यांना पाळता येत नसेल तर त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही’, अशी टीका जीतू पटवारी यांनी केली.

सतना येथे काँग्रेस उमेदवाराच्या रॅलीत Jitu Patwari यांनी ही टीका केली. मोदींची गॅरेंटी खोटी निघाली आहे. गव्हाला 2700 रुपये प्रतिक्विंटल आणि तांदळाला 3100 रुपये प्रतिक्विंंटल भाव मिळेल, अशी ‘मोदी गॅरेंटी’ भाजपने दिली होती. पण तसे झाले नाही. दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकत नसतील तर त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही, असे ते जीतू पटवारी पुढे म्हणाले. उमेदवारी रॅलीत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंह, राज्यसभा सदस्य विवेक तंखा, माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव हेही उपस्थित होते.

भाजप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. प्रशासन भाजपचे नोकर बनून काम करत आहेत. आता काँग्रेस आणि समाजवादी पार्टी असे एक-एक मिळून अकरा आहेत. आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही पन्ना येथे जीतू पटवारी यांनी दिला.