नंदीग्राममध्ये काँग्रेसला पाठिंबा, निवडणूक आयोगाच्या कारवाईवर ममता बॅनर्जींचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसचे (TMC) नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या कारवाईला त्यांनी राजकीय सूडबुद्धी आणि लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हटले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूलच्या उमेदवार संचिता प्रधान डे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या व्यापक हितासाठी आणि एकजुटीसाठी नंदीग्राममध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

निवडणूक आयोगाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ममता बॅनर्जी यांनी हा आदेश बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक आयोगाने, अशी कारवाई का केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आम्ही नक्कीच पुन्हा जिंकणार. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस माझ्यासोबत राहील. मी या पक्षाची संस्थापक अध्यक्षा आहे आणि मी पक्ष कधीही सोडणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाने आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत, असे सुनावत त्यांनी ज्या पक्षाने चार महिन्यांपूर्वी निवडणूक जिंकली होती, त्यांचे चिन्ह आता अवैध ठरवण्यावर तीव्र संताप व्यक्त केला.