
तव्यावर चपाती छान फुगून गोलाकार दिसली की ती मऊ आणि व्यवस्थित तयार झाल्याचे जाणवते. मात्र, अनेकदा चपाती फुगण्याऐवजी सपाट राहते किंवा कडक होते. यामागे केवळ तवा किंवा रोटी लाटण्याची पद्धत कारणीभूत नसते. अनेकदा पीठ मळतानाच काही चुका झालेल्या असतात.
चपाती साठी पीठ मऊ असणे महत्त्वाचे आहे. पीठ खूप घट्ट असल्यास चपाती लाटताना कडांवरून तुटू शकते आणि भाजल्यानंतरही ती कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी एकदम न घालता हळूहळू घालून पीठ मळावे. साधारण एका कप गव्हाच्या पिठासाठी सुमारे १५० मिलीलीटर कोमट पाणी लागू शकते. मात्र, पाण्याचे प्रमाण पिठाच्या प्रकारानुसार बदलू शकते.
पीठ खूप सैल किंवा चिकटही ठेवू नये. तसेच पीठ मळल्यानंतर लगेच चपाती लाटण्याची घाई करू नका. पीठ झाकून साधारण २० ते ३० मिनिटे ठेवले तर त्याला विश्रांती मिळते. त्यामुळे पीठ लाटणे सोपे होते आणि चपातीचा पोतही सुधारण्यास मदत होते.
चपाती लाटताना तिची जाडी सर्वत्र जवळपास सारखी असावी. एखादा भाग खूप जाड आणि दुसरा खूप पातळ असल्यास चपाती समान पद्धतीने शिजत नाही. लाटण्यासाठी खूप जास्त कोरडे पीठ वापरल्यास रोटी कोरडी आणि कडक होऊ शकते. त्यामुळे आवश्यक तेवढेच पीठ वापरावे.
तव्याची योग्य उष्णताही महत्त्वाची आहे. तवा खूप थंड असल्यास रोटी हळूहळू शिजते आणि कोरडी होऊ शकते. दुसरीकडे तवा अतिशय गरम असल्यास रोटी बाहेरून पटकन भाजली किंवा जळली जाऊ शकते. त्यामुळे चपाती भाजण्यापूर्वी तवा योग्य तापलेला असावा.
चपातीवर हलके फुगे दिसू लागले की ती पलटावी. दुसऱ्या बाजूला हलके तपकिरी डाग दिसल्यानंतर पुन्हा पलटून हलक्या हाताने दाबल्यास चपाती फुगण्यास मदत होऊ शकते. म्हणून चपाती फुगत नसेल तर केवळ तव्याला दोष देऊ नका. पीठातील पाण्याचे प्रमाण, मळण्याची पद्धत, पीठाला दिलेली विश्रांती, चपातीची जाडी आणि तव्याची उष्णता या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.




























































