
राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील एका २ वर्षांच्या चिमुरड्याला नवीन आयुष्य मिळाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे कोंड खंडकर येथील रहिवासी असलेल्या कु. अनिश राजेंद्र आग्रे या बालकाला जन्मतःच ऐकू व बोलता येत नव्हते. अंगणवाडी आरोग्य तपासणीदरम्यान आरबीएसकेच्या वैद्यकीय पथकाने या गंभीर आजाराचे निदान केले.
यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या संदर्भसेवेद्वारे सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण करून २ जुलै २०२६ रोजी क्रिटीकेअर हॉस्पिटल, मुंबई येथे अनिशवर अत्यंत गुंतागुंतीची ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत आणि यशस्वीरीत्या करण्यात आली. शासनाच्या या कल्याणकारी योजनेमुळे बालकास नवसंजीवनी मिळाली असून, आग्रे कुटुंबाने वैद्यकीय पथकाचे मनापासून आभार मानले आहेत.






























































