
यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामातील बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी दमदार पावसाअभावी पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून खरीप हंगामाबाबत चिंता वाढत आहे.
यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने केवळ शेतकरीच नव्हे तर शेतमजूर, व्यापारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित सर्व घटक हवालदिल झाले आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास येणाऱ्या काळात पाणीटंचाईसह शेती आणि अर्थकारणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. उष्णतेची तीव्रता कायम असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात पावसासाठी पारंपरिक लोकपरंपरांना पुन्हा उजाळा मिळत आहे.
वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी अनेक गावांमध्ये “धोंडी धोंडी पाणी दे…” हा पारंपरिक उपक्रम सुरू झाला आहे. कमरेला कडुलिंबाच्या फांद्या बांधून सामान्य नागरिक आणि शेतकरी गावोगावी फिरत पावसासाठी प्रार्थना करत आहेत. काही ठिकाणी डोक्यावर पाण्याचा घडा घेऊन पारंपरिक नृत्य केले जात असून, डफलीच्या तालावर “धोंडी धोंडी पाणी दे, रान हिरवेगार होऊ दे…” अशा ओव्या गात नागरिक दारोदार फिरताना दिसत आहेत.
ग्रामीण संस्कृतीत पावसासाठी केले जाणारे हे लोकविधी आजही श्रद्धेने जपले जात आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही निसर्गावर अवलंबून असलेला शेतकरी शेवटी वरुणराजाकडेच आशेने पाहत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, हवामान अनुकूल होऊन येत्या काही दिवसांत दमदार पावसाची सुरुवात व्हावी, अशी प्रार्थना शेतकरी बांधवांकडून केली जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास खरीप पिकांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.





























































