असंवेदनशील सरकारसमोर स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलन करू नका, पवन खेडांचे सोनम वांगचुक यांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय शिक्षणमंत्री धरेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले लडाखेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना देशभरातून पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत अनेक राजकीय नेते, कलाकारांनी त्यांची भेट घेतली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार पवन खेडाही जंतरमंतरवर पोहोचले. यावेळी खेडा यांनी वांगचुक यांना आपले प्राण धोक्यात न घालण्याचे आवाहन केले. एका असंवेदनशील सरकारसमोर अशा प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलन करू नका, असे आवाहन त्यांनी काँग्रेसच्या वतीने आंदोलकांना केले.

पवन खेडा यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत, लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार असल्याचे सांगितले. नागरिक जेव्हा उपोषणाला बसतात तेव्हा त्यांची बाजू ऐकून घेणे हे सरकारचे कर्तव्य असते. पण हे सरकार आंदोलकांकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनीही सोशल मीडियाद्वारे आंदोलकांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केल्याचे खेडा यांनी नमूद केले.

पवन खेडा यांनी माध्यमांशी बोलताना इंदिरा गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारांचे दाखले दिले. ते म्हणाले की, 1984 मध्ये इंदिरा गांधींनी आणि 2011 मध्ये मनमोहन सिंग सरकारने नेहमीच आंदोलकांशी संवाद साधण्याला प्राधान्य दिले होते. सरकारची पहिली जबाबदारी चर्चेची असते. मात्र, सध्याचे केंद्र सरकार पूर्णपणे गप्प बसले आहे. शैक्षणिक सुधारणांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास नकार देणे हा केवळ अहंकार नसून ती सरकारची संवेदनशीलता आहे, असा घणाघात त्यांनी केला.

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही गुरुवारी जंतरमंतरवर जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली. आंदोलन स्थळावरून बोलताना केजरीवाल यांनी देशातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा पद्धतीमध्ये तातडीने सुधारणा करण्याची गरज असल्यावर भर दिला. सोनम वांगचुक हे स्वतःसाठी नाही तर, देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा लढा लढत असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.