भ्रष्टाचारामुळचे दुर्घटना घडत आहेत; विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाजावाजा करुन उभारण्यात आलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याचे फोटो व्हायरल झाले होते. मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळ स्लॅबलाच भगदाड पडल्याने सोमवारी विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना घेरले. या सर्व दुर्घटना भ्रष्टाचारामुळेच घडत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी केला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) भागात दरड कोसळल्याच्या घटनेवर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘मिसिंग लिंक’च्या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वीही, जेव्हा थोडासा पाऊस पडला होता, तेव्हा तिथे मोठे खड्डे पडले होते आणि रस्ता वाहून गेला होता. माती मऊ असल्यामुळे संपूर्ण मुख्य रस्ताच खचला होता. या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. येथील काम निकृष्ट दर्जाचे आहे, असा आरोप त्यांनी केला.

विजय वड्डेटीवार म्हणाले की, ‘मिसिंग लिंक’ असेल किंवा इतर ठिकाणी दरड कोसळणे, हे सरकार टक्केवारीचे आहे. टक्केवारी घेतल्याने सरकारकडूनही काहीही होणार नाही. अशा दुर्घटना भ्रष्टाचारामुळेच घडत आहे, असे ते म्हणाले.
वड्डेटीवार यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्दैवी दुर्घटना घडून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडून, झाडे कोसळून तसेच मानखुर्द येथील इमारत दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाच्या तयारीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. राज्यात पावसाळ्यापूर्वी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्याचा . धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण, दिसून येते. झाडांची छाटणी, मॅनहोलची सुरक्षितता, जलनिस्सारण व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन प्रभावीपणे राबविले असते, तर अनेक दुर्घटना टाळता आल्या असत्या. याचवेळी मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात दरड कोसळल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यापूर्वीही या प्रकल्पातील त्रुटी समोर आल्या होत्या. त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे, असे ते म्हणाले.

राज्य सरकारने या सर्व दुर्घटनांबाबत तातडीने अधिकृत भूमिका जाहीर करून नागरिकांना वस्तुस्थिती आणि करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती द्यावी. तसेच मुंबईसह राज्यातील सर्व पावसाळी दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व विभागांची जबाबदारी निश्चित करत दोषींवर कठोर कारवाई करावी.