
अमेरिकेने गुरुवारी पहाटेपासून इराणविरुद्धच्या हल्ल्यांची तीव्रता वाढवली आणि उत्तरेकडील लक्ष्यांवर मारा केला. तसेच अमेरिकन सैन्याने नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जहाजावरही गोळीबार केला. या जहाजावर इस्लामिक प्रजासत्ताकावरील (इराणवरील) अमेरिकेची नाविक नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याला प्रत्युत्तर देत इराणने बहारीन, जॉर्डन आणि कुवेतला लक्ष्य करून क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले केले.
मध्य पूर्वेतील अमेरिका आणि इराण यांच्यातील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे आणि होर्मुझ सामुद्रधुनीबाबतच्या (Strait of Hormuz) नव्याने निर्माण झालेल्या संघर्षामुळे इराण युद्ध संपवण्यासाठी झालेला सामंजस्य करार मोडीत निघाला आहे. यामुळे हा प्रदेश पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. इराणच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ३५ हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. आता पहिल्यांदाच इराणची राजधानी तेहरानच्या आसपासच्या भागांवरही हल्ले झाले.
कच्च्या वाढत्या किमतींमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचा रिपब्लिकन पक्ष यांच्यासमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नोव्हेंबरमधील निवडणुकांमध्ये काँग्रेसवरील (संसदेवरील) आपले वर्चस्व कायम राखण्याची त्यांची आशा आहे. मात्र, हा होर्मुझ सामुद्रधुनीचा जलमार्ग पुन्हा खुला करण्यात वॉशिंग्टनला अपयश आले. त्यामुळे ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा एकदा नाविक नाकेबंदी लागू केली.
इराणच्या संसदेचे अध्यक्ष आणि मुख्य वार्ताकार मोहम्मद बागेर गालीबाफ यांनी सांगितले की, अमेरिकेने सामंजस्य करारातील अटींचे पालन केले नाही, तर इराण पूर्ण-प्रमाणावरील लष्करी संघर्षासाठी सज्ज आहे. तसेच, इराणच्या निमलष्करी ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने नाकेबंदीच्या मुद्द्यावरून आखाती देशातून होणारी सर्व ऊर्जा-निर्यात थांबवण्याची धमकी दिली आहे.
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असा दावा केला की इराण शांतता करार करण्यास तयार आहे. मात्र, त्यांनी याबद्दल अधिक तपशील दिला नाही. आम्ही जे करत आहोत ते त्यांना आवडत नाही आणि त्यांना समझौता करायचा आहे. आम्ही त्यांच्याशी समझौता करणार आहोत की हा विषय कायमचा संपवणार आहोत, हे लवकरच स्पष्ट होईल, असे त्यांनी बुधवारी पेनसिल्व्हेनिया येथील ‘यूएस आर्मी वॉर कॉलेज’मध्ये सांगितले. मात्र, दोन्ही देशातील संघर्ष सतत वाढत असल्याने आखाती देश पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे.





























































