ते दहशतवादी आहेत का? विद्यार्थ्यांवर A-47 मधून गोळीबार केल्याच्या घटनेवर प्रियांका गांधी यांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित गोळीबाराच्या घटनेवरून भाजपवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. आंदोलक विद्यार्थी काय दहशतवादी आहेत का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजप सरकार आपली दडपशाहीची सवय सोडत नसून, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये आजही विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.


संसदेच्या परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, हा प्रकार आता अतिशय टोकाला गेला आहे. प्रशासनाकडून अजूनही विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करणे सुरूच असून, कदाचित सोमवारी रात्री किंवा मंगळवारी सकाळीच बिहार आणि बंगालमध्ये हे घडल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. याशिवाय, जंतरमंतर येथील आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक तरुणींना फोन करून धमकावले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. मुलींनी अशा आंदोलनांमध्ये का सहभाग घेतला, अशी विचारणा करत आपल्या देशात मुलींना आंदोलनाचा अधिकार नाही का, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.