महाराष्ट्रातील गुन्हेगारांना कायद्याचं संरक्षण; राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिला सुरक्षा विषयावरून संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे नसरापूराची पुनरावृत्ती झाली. येथे एका 25 वर्षीय तरूणाने 10 वर्षीय मुलीला शेतात नेऊन अत्याचार केला. यानंतरगळा दाबून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी आणि महिला सुरक्षा विषयावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. महाराष्ट्रात सातत्याने लहान मुलींवर होणारे अत्याचार आणि खून करणाऱ्या गुन्हेगारांना कायद्याचं संरक्षण असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.

संजय राऊत यांनी गुरूवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात घडणाऱ्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर  थेट सरकारला आणि पोलीस प्रशासनाला जाब विचारला आहे. महाराष्ट्रात सातत्याने लहान मुलींवर अत्याचार करून त्यांचे खून केले जात आहेत. जुन्नरमध्ये अजूनही संतप्त वातावरण आहे. त्यामुळे लोकं रस्त्यावर उतरले आहेत. काय करताहेत राज्याचे मुख्यमंत्री? तुमच्याच राज्यात ज्यापद्धतीने 9, 10 वर्षांच्या कोवळ्या मुलींवर अत्याचार सुरू आहेत. तुम्हाला सरकारला वेदना होत नाहीत का? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. महिलांवर होणाऱ्या या अत्याचारांच्या घटनांवरून आपला संपात व्यक्त करताना ‘तुम्हाला महिला आरक्षणाचे बिल जे अधिच मंजूर झाल्यायं तेच परत मंजूर करायचंय’, असे ते यावेळी म्हणाले.

जुन्नरमधील प्रकरणावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर मौन बाळगल्याचे ते म्हणाले. तुम्ही इतर सगळ्या गोष्टींवर पोपटपंची करता. पण या महाराष्ट्रात सातत्याने कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहेत, कोवळ्या मुली सर्पदंशाने मरताहेत, जीवन संपवताहेत, त्यावर या राज्याचे मुख्यमंत्री, राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री, या राज्याचे डुप्लीकेट उपमुख्यमंत्री यांना कधी तरी बोलावसं वाटतं का? असे सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केले.

देवेंद्र फडणवीस अपयशी गृहमंत्री

पोलीस यंत्रणा या बलात्काऱ्यांना वाचवण्याच्या मागे लागलेली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. पोलीस संरक्षणामध्ये हे सगळं बेकायद्याचं राज्य सुरू आहे. देवेंद्र फडणवीस याबबतीत अपयशी गृहमंत्री आहेत. पोलिसांनीही हात वर केलेले आहेत. एका बलात्काराच्या प्रकरणवर आवाज उठवणाऱ्याला तुम्ही खोट्या प्रकरणात तुरूंगात टाकण्याची धमकी देता. अशी धमकी जर पोलीस देत असतील तर या महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार होणारच, असा गंभीर इशारा संजय राऊत यांनी दिला.