
तस्करांच्या जाळ्यात अडकलेल्या 216 कासवांची सुखरूप सुटका करण्यात आली. 800 किलोमीटरचा प्रवास करून या कासवांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले असून वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक विश्रांतीनंतर त्यांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली.
या कासवांच्या वाहतुकीसाठी विशेष वन्यजीव रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला. प्रवासादरम्यान त्यांना हवेशीर आणि सुरक्षित वाहकांमध्ये ठेवण्यात आले होते. मुंबई वन विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि वन्यजीव तज्ञांच्या पथकाने प्रवासादरम्यान त्यांच्या आरोग्याची आणि पाण्याच्या गरजेची नियमित तपासणी केली.




























































