छातीवर घट स्थापन करणारा ‘तो’ बाबा निघाला खुनातील आरोपी, तरुणीला संपवलं!

श्रीरामपुरात नवरात्रोत्सव काळात छातीवर घटाची स्थापना करणाऱ्या एका महंताच्या दर्शनासाठी लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. या महंताच्या दर्शनासाठी भाविकांची दररोज अक्षरशः रिघ लागत होती. मात्र हा महंत खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असून तो फरार झाला आहे.

सदर महंताचे नाव महेश्वरानंद असे आहे त्याचे मूळ नाव महेश अर्जुन माने आहे. त्याचा पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथे मठ आहे. त्यांचा भाऊ बालकृष्ण महाराज याच्यासह तो मठाचे काम पाहतो. महंत महेश्वरानंद याचे पुणे, मुंबई, उस्मानाबाद, सोलापूर, पनवेल आणि सांगली येथे भक्त परिवार आहे. मात्र वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार, वय – 34, रा. शनिवारपेठ, कोल्हापूर हिचा खुन केल्याप्रकरणी महंत महेश्वरानंदवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात मुलीची आई शुभांगी, भाऊ श्रीधर, तसेच दोन सेवेकरी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. महंत महेश्वरानंद गुन्ह्यातील आरोपी असून तो फरार झाला आहे. या मुलीचा विवाह कोल्हापुरातील एका तरूणाशी याच महंताच्या पुढाकारातून जुळविण्यात आला होता. मात्र मुलीने व तिच्या होणाऱ्या वराने काही दिवस विवाह न करता लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.तो कुटूंबीयांना मान्य नव्हता. त्यामुळे आई व भावाने मुलीला महंताकडे नेले. तेथे तिची समजूत काढत विवाह करण्याचा आग्रह धरण्यात आला, मात्र तरीही मुलीने नकार कळविल्याने देवठाणे येथील मठात तिला मारहाण करण्यात आली. यातच मुलीचा मृत्यू झाला होता. लक्ष्मपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत

सेवेकरी, आई व वडील यांनी महंतांच्या सांगण्यावरून मारहाण केल्याचा आरोप आहे. या मुलीचे संपूर्ण कुटुंबीय महंताचे भक्त परिवारातील सदस्य आहेत. मुलीचा खून 3 एप्रिल 2024 रोजी झाला होता. त्यानंतर हळूहळू या गुन्ह्याची उकल होत गेली. आता महंतावर गुन्हा दाखल होऊन तो फरार होताच ही बातमी श्रीरामपुरात येवून धडकली. त्यामुळे त्याला येथे पाचारण करणाऱ्या स्थानिक नेत्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. महंताच्या दर्शनासाठी व नवरात्रीतील आरतीला जिल्ह्यातील काही राजकीय नेते व प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहिले होते. महंतांच्या छातीवर घट स्थापनेच्या कृत्याचे त्यावेळी अनेकांनी गोडवे गायले होते. मात्र खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे समजताच श्रीरामपुरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, श्रीरामपुरात नवरात्र उत्सवापूर्वी पंधरा दिवस व नंतर पंधरा दिवस असे एक ते दीड महिने महंत महेश्वरानंदचे वास्तव्य होते. त्यांना अनेकांनी चक्क गुरू मानले होते. महंतांना घरी मुक्कामी नेण्यासाठी अनेकांचा आग्रह असायचा. आता हाच बाबा एका खुनाच्या प्रकरणात आरोपी असल्याचे पुढे आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सदर बाबा हा खुनाच्या गुन्ह्यात आरोपी निघाल्याने या बाबाला श्रीरामपुरात आणणारे संयोजक आता टिकेचे धनी ठरत आहेत. कारण अशाप्रकारच्या बाबाला श्रीरामपुरात आणून त्याची महती सांगणाऱ्यांनी त्याच्या मुळात जाऊन तो नेमका कोण आहे? काय आहे? याची माहिती घेणे गरजेचे होते. परंतु, तसे न झाल्याने आता बाबा थेट आरोपी निघाल्याने श्रीरामपुरात या बाबाला आणणाऱ्यांना जनतेच्या टिकेला सामोरे जावे लागत आहे.