
जमलेल्या सर्व तरुणांनो आणि तरुणींनो…अशी सुरुवात करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तरुणाईचे अभिनंदन केले. विद्यार्थी आणि तरुणांनी जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवले त्या आंदोलनाला यश आले. देशातील जेन झी सरकारच्या कशा झिंज्या उपटतात ते या आंदोलनातून कळले, असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल राज ठाकरे यांनी या वेळी आभार व्यक्त केले. हाच महाराष्ट्रातला आणि दिल्लीतला फरक आहे. महाराष्ट्रातले आणि दिल्लीतले पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळले आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे एकत्रच व्यासपीठापर्यंत पोहोचले. आदित्य ठाकरे यांनी हातात तिरंगा घेतला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, सुनील प्रभू, राजन विचारे, मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार महेश सावंत, सुनील शिंदे, मनोज जामसुतकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सुधीर साळवी, साईनाथ दुर्गे, सुप्रदा फातर्पेकर, उपनेते संजय सावंत, नितीन सरदेसाई, नगरसेवक निशिकांत शिंदे, अंकित प्रभू आदी उपस्थित होते.


























































