परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे नागरिकांचे बळी; प्रताप सरनाईकांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यभरातील रस्त्यांवर सातत्याने होत असलेले अपघात आणि त्यात मृत्यूमुखी पडणा-या नागरिकांची संख्या पाहता रस्ता सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळेच राज्यात अपघातांची व बळींची संख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

मुरबाड -कल्याण मार्गांवर इको कारच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ११ जणांना काँग्रेस पक्षाकडून श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी किमान १५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच या अपघाताला जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली.

कल्याणसह राज्यभरात विविध ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक सुरु असून त्यातून अपघात घडतात, पण परिवहन विभागाचे अधिकारी व पोलीस हप्ते घेऊ याकडे दुर्लक्ष करतात. परिवहन मंत्र्यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या मालकीच्या जमिनीतील वाट्याच्या राजकारणात गुंतण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले असते, तर अपघातांचे प्रमाण कमी झाले असते, असा टोला त्यांनी लगावला.

सरकारच्या अपयशामुळे अपघातांमध्ये वाढ

काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला होता, तर ६ मार्च रोजीही त्याच मार्गावर तीन मजुरांचा बळी गेला होता. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि मुंबईसह राज्यभारातील महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येते. हे अपघात परिवहन विभागाच्या गलथानपणाचे परिणाम आहेत.

बचावासाठी त्यांना एक सेकंदही मिळाला नाही, कल्याण – मुरबाड मृत्यूचा मार्ग; एका क्षणात होत्याचे नव्हते झाले

रस्ते अपघातातील बळींचा वाढता आलेख

२०१९ साली राज्यात रस्ते अपघातांत १२,७८८ जणांचा मृत्यू झाला होता. २०२४ मध्ये ही संख्या २३ टक्क्यांनी वाढून १५,७१५ वर पोहोचली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या देखील चिंताजनकरीत्या वाढत आहे. २०२४ मध्ये या मार्गावर १३७ अपघात झाले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या ३७ टक्क्यांनी वाढून १८५ वर पोहोचली. मृतांची संख्या २०२४ मध्ये १२६ वरून २०२५ मध्ये १५२ इतकी वाढली आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या दडवण्याचा प्रयत्न

२२ जानेवारी २०२६ रोजी परिवहन आयुक्तांनी माध्यमांसाठी जारी केलेल्या निवेदनात समृद्धी महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या दडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिवहन विभागाने आपले अपयश लपवण्यासाठी केलेली ही धडपड सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ठरत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.