
>> बी. व्ही. जोंधळे
आज विभूती पूजा वाढलेली दिसते. बहुमतामुळे सरकारची वाटचाल ‘हम करे सो कायदा’ या दिशेने होत आहे. निवडणुकांच्या राजकारणासाठी जाती–धर्माचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे. संविधानाने पुरस्कारिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय व धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या विरुद्ध वर्तनव्यवहार होत आहे. त्यामुळे दलित, वंचित, अठरापगड जाती, महिला, तरुण–तरुणींचे भवितव्य, बहुजन समाजाचे हितच धोक्यात आले आहे. तेव्हा आंबेडकरवाद जिवंत ठेवण्यासाठी दलित, अल्पसंख्याक, दबलेल्या तमाम समाजघटकांनी एकत्र येऊन प्रतिक्रांतीविरोधी शक्तींविरुद्ध लढण्याची गरज आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तीच खरी मानवंदना ठरेल.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विशेषता अशी की, सामाजिक समतेच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी हयातभर विषमतेविरुद्ध अथक संघर्ष केला. हजारो वर्षे ज्या हिंदू धर्मग्रंथांनी, रूढी-प्रथा परंपरांनी बहिष्कृत वर्गाला गुलामगिरीच्या बेडय़ांनी जखडले होते, त्या गुलामगिरीच्या बेडय़ा तोडण्यासाठी त्यांनी सत्याग्रही लोकलढे उभारले. आम्ही जर हिंदू नि माणसासारखे माणूस आहोत, तर आम्हाला समता, स्वातंत्र्य, बंधुभाव नि न्यायाची वागणूक मिळाली पाहिजे, हे सिद्ध करण्यासाठीच त्यांनी 91 वर्षांपूर्वी महाडच्या चवदार तळ्यावर पाण्याला स्पर्श करून पाणी पिण्याचा आणि पुढे नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रहसुद्धा केला. पण सनातनी जीर्णशीर्ण रूढीने बाबासाहेबांचे व इतर सत्याग्रहींचे स्वागत गळाभेटीने न करता दगडधोंडय़ांनी केले तेव्हा ‘‘आम्ही तुमच्या लाथा खाऊ, पण हिंदू धर्मातच राहू हे जमणार नाही’’ हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, लोकशाहीवादी, विज्ञाननिष्ठ बुद्ध धम्म स्वीकारला.
बाबासाहेब केवळ सत्याग्रही लढे देऊनच थांबले नाहीत, तर त्यांनी सत्याग्रही लढय़ांना विधायक रचनात्मकतेची जोड दिली. बहिष्कृत वर्गाच्या सामाजिक हक्कांसाठी, त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी 9 मार्च 1924 रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हे या संस्थेचे ध्येयवादी ब्रीद होते. बहिष्कृत हितकारिणी सभेने सोलापूर येथे अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारले होते. मुंबईत वाचनालय व एक हॉकी क्लब सुरू केला होता. तरुण वर्गात शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी ‘सरस्वती विलास’ नावाचे मासिक सुरू केले होते. समाजातील सर्व घटकांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी 1 जुलै 1945 रोजी मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून सिद्धार्थ महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे याच संस्थेच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना छत्रपती संभाजीनगर शहरात 1950 मध्ये स्थापना करून मराठवाडय़ात उच्च शिक्षणाची सोय केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या लढय़ामुळे दलित समाजाचा जरूर विकास झाला, पण बाबासाहेबांच्या स्वप्नातील सामाजिक समता नि सामाजिक विकास अजूनही प्रत्यक्षात साकारलेला नाही, हेही तितकेच खरे आहे. बहुसंख्य दलित सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाअभावी अभावग्रस्त जीवन जगत आहेत. शेतकरी सुधारणेचे कायदे होऊनही बहुसंख्य दलित भूमिहीन शेतमजूर म्हणून जगत आहेत. असंघटित कामगार असुरक्षित आहेत. शिक्षित तरुणांत बेरोजगारी वाढत आहे. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि खासगीकरण व पंत्राटीकरणाच्या धोरणामुळे खासगी क्षेत्रात दलित युवकांना वावच राहिलेला नाही. पेंद्र व राज्य सरकारांमध्ये दलितांना दिल्या जाणाऱ्या मंत्रालयाच्या जबाबदारीचा विचार केला तर राजकीय सत्तेचा वाटा नाममात्र आहे. राष्ट्रीय संपत्तीतील त्यांचा वाटा नाममात्र आहे आणि दलित समाजाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद केली जात नाही, हे कटू वास्तव आहे.
बाबासाहेब शिक्षणाला ‘वाघिणीचे दूध’ म्हणत आणि आमच्या सर्वच सामाजिक दुखण्यावरील प्रभावी औषध म्हणजे शिक्षण होय, असे सांगत. पण दलित-वंचितांची शिक्षणाची दारेच बंद करण्याचे धोरण सरकारी पातळीवरून राबविले जात आहे. पाचपन्नास वर्षांपूर्वी सरकारी शाळांतून गोरगरीब दलितांना स्वस्तात शिक्षण मिळत असे, पण आता सरकार पुरस्कृत धोरणामुळे सरकारी शाळांची दुर्दशा झाली असून देशात गेल्या 12 वर्षांत हजारो शाळा बंद झाल्या आहेत. आधी जे शिक्षण सरकारी शाळांमधून मोफत मिळत असे ते शिक्षण आता खासगी शाळांमधून घेण्यासाठी हजारो रुपये भरावे लागतात, जे दलितांना शक्य नाही. कारण खासगी शाळांची फी हजारो रुपयांच्या घरात गेली आहे. उच्च शिक्षणाचेही खासगीकरण केल्यामुळे दलित-वंचितांच्या शिक्षणाच्या वाटाच बंद झाल्या आहेत. म. फुले, राजर्षी शाहू महाराज,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे धोरणच कमकुवत करण्याच्या सरकारच्या नीतीमुळे आता कुठे एक-दोन पिढय़ा शिकून सवरून पुढे आलेल्या असताना त्यांच्या आत्मोद्धाराच्या वाटाच बंद करण्यात येत आहेत आणि राजकीय लाभासाठी बाबासाहेबांना स्मारके, पुतळे, नामकरणात बंदिस्त करून दलितांचे लक्ष मूलभूत प्रश्नावरून दूर करून त्यांना भावनात्मक राजकारणात गुंतविण्यात येत आहे. तात्पर्य, बाबासाहेबांचे सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यासाठी बाबासाहेबांचा समग्र सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतिदर्शी कृतिशील विचारांची अंमलबजावणी होण्याची खरी गरज आहे, पण असे न घडता इतिहासाची चाके उलटी फिरविण्याचा प्रतिगामी प्रतिक्रांतीचा खेळ जोरात सुरू झालेला आहे.
आज विभूती पूजा वाढलेली दिसते. बहुमतामुळे सरकारची वाटचाल ‘हम करे सो कायदा’ या दिशेने होत आहे. निवडणुकांच्या राजकारणासाठी जाती-धर्माचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे. संविधानाने पुरस्कारिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय व धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या विरुद्ध वर्तनव्यवहार होत आहे. त्यामुळे लोकशाहीसमोर धर्मांधतेचे संकट निर्माण झाले असून दलित, वंचित, अठरापगड जाती, महिला, तरुण-तरुणींचे भवितव्य, बहुजन समाजाचे हितच धोक्यात आलेले दिसते. तेव्हा आजच्या या विदारक परिस्थितीचा सामना करून आंबेडकरवाद जिवंत ठेवण्यासाठी दलित, अल्पसंख्याक, दबलेल्या तमाम समाजघटकांनी एकत्र येऊन प्रतिक्रांतीविरोधी शक्तींविरुद्ध लढण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हीच खरी मानवंदना ठरेल.




























































