
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या वतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने बहिष्कार घातला. राज्यावर दुष्काळाचे सावट, भीषण पाणीटंचाई, शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्येत वाढ, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, इंधन तुटवडा, महागाई, नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय याकडे पूर्णपणे डोळेझाक करून केवळ औपचारिक चहापानाचा कार्यक्रम आयोजित करणे विरोधी पक्षाला मुळीच मान्य नाही, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडली. राज्यातील 13 कोटी जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविणे हे सरकारचे कर्तव्य असून पावसाळी अधिवेशनात जनतेचे सर्व मुद्दे महाविकास आघाडी आक्रमकपणे मांडून सरकारला धारेवर धरणार असा इशाराही महाविकास आघाडीने दिला.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक मंत्रालयाजवळील शिवसेनेच्या शिवालय या राज्य संपर्क कार्यालयात पार पडली. त्या बैठकीतील चर्चेनंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. शासकीय चहापानावर बहिष्कार घातल्याचे पत्र सरकारला दिले असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विविध मुद्दय़ांवरून महायुती सरकारवर या वेळी जोरदार हल्ला चढवला. या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते-आमदार अंबादास दानवे, अॅड. अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पार रसातळाला गेली आहे. राज्यकर्त्यांनी नीट परीक्षेत घोटाळा करून 22 लाख तरुणांचे भवितव्य अंधारात टाकले आहे. पेपरफुटीचे मूळ महाराष्ट्रात असावे यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. काय करतेय कायदा व सुव्यवस्था, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
आमदार-खासदारांची फोडाफोडी सुरू आहे. सत्ताधारी विरोधी पक्षांविरोधात सरकारी यंत्रणेचा वापर करत आहेत. सरकारमध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांची कमिशनखोरी वाढली आहे. नोटा वाटून लोकशाही बरबाद करण्याचे काम सुरू आहे. निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सरकार कोणत्याही थराला जात आहे.
सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी आहे. शेतकऱ्यांना अटी-शर्तीमध्ये अडकवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याही भावाला हमीभाव नाहीये, आता सरकार सगळीकडे हेच सांगत सुटेल की आम्ही दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली, परंतु शेतकऱ्यांच्या समस्या आहेत तशाच आहेत, असा आरोप करतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी केली होती, तेव्हा एकाही शेतकऱ्याची कर्जमाफीसंदर्भात तक्रार आली नव्हती, असे भास्कर जाधव म्हणाले. शेतकऱ्यांचे दुःख, महिलांचा आक्रोश आणि तरुणांची वणवण ज्या सरकारला कळत नाही, त्या सरकारसोबत आम्ही चहापान करू शकत नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
घोटाळे उघड करूनही कारवाई नाही – जयंत पाटील
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. ड्रग्जचे प्रमाण राज्यात प्रचंड वाढले आहे. अशा प्रकरणात छोटय़ा लोकांना अटक होते, पण मास्टरमाईंड मात्र मोकाट असतात. अमली पदार्थ विकणारे आणि पोलिसांचे हितसंबंध आहेत यातून या घटना वाढत आहेत. देवस्थानच्या जमिनीचा घोटाळा मागील अधिवेशनात मांडला, पण काही कारवाई नाही अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
राज्यातील पाण्याचे नियोजन करण्यात सरकार पुरते अपयशी ठरल्याने दुष्काळी आणि पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोपही त्यांनी केली. विविध घोटाळे महाविकास आघाडीने मागील अधिवेशनांमध्ये प्रभावीपणे मांडले, परंतु सरकारने अद्याप त्यावर काहीच कारवाई केलेली नाही, असेही ते म्हणाले. कुणीही आपल्या विरोधात काही मुद्दे मांडू नयेत म्हणून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सरकारने अद्याप विरोधी पक्षनेता नेमलेला नाही, अशा सरकारच्या चहापानाला जाण्यात अर्थ नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
हे बदमाशांचे सरकार – भास्कर जाधव
महायुती सरकार हे जनतेची, लाडक्या बहिणींची, शेतकऱ्यांची, तरुणांची फसवणूक करणारे बदमाशांचे सरकार आहे अशी टीका शिवसेना नेते-आमदार भास्कर जाधव यांनी केली. लाडकी बहीण योजना हळूहळू बंद करण्याच्या मार्गावर आहे. सरकारने 81 लाख महिलांना अपात्र केले आहे. याच महिलांच्या मतांवर महायुती सरकार सत्तेवर आले होते. या महिला ज्यांच्यामुळे अपात्र ठरल्या आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी जाधव यांनी केली. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पार रसातळाला गेली आहे. राज्यकर्त्यांनी नीट परीक्षेत घोटाळा करून 22 लाख तरुणांचे भवितव्य अंधारात टाकले आहे. पेपरफुटीचे मूळ महाराष्ट्रात असावे यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. काय करतेय कायदा व सुव्यवस्था, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी आहे. शेतकऱ्यांना अटी-शर्तीमध्ये अडकवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याही भावाला हमीभाव नाहीये, आता सरकार सगळीकडे हेच सांगत सुटेल की आम्ही दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली, परंतु शेतकऱ्यांच्या समस्या आहेत तशाच आहेत, असा आरोप करतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी केली होती, तेव्हा एकाही शेतकऱ्याची कर्जमाफीसंदर्भात तक्रार आली नव्हती, असे भास्कर जाधव म्हणाले. शेतकऱ्यांचे दुःख, महिलांचा आक्रोश आणि तरुणांची वणवण ज्या सरकारला कळत नाही, त्या सरकारसोबत आम्ही चहापान करू शकत नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करतेय – सतेज पाटील
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही विविध मुद्दय़ांवरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, महायुती सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहे. गरज नसतानाही शक्तिपीठ महामार्ग उभारून शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेतल्या जात आहेत. एमपीएससीच्या परीक्षा रखडल्या आहेत. मुंबई विद्यापीठाचे पेपर फुटत आहेत. महिलांवरील व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार वाढले आहेत. 14 हजार पुरुषांना लाडक्या बहिणींचे 1500 रुपये दिले गेले हा देशातील सर्वात मोठा गव्हर्नन्स फेल्यूअर आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
राज्यावर अल निनोचे संकट आहे याची सूचना सरकारला येऊनही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. राज्यातील 13 कोटी जनतेला जे अभिप्रेत होते त्यातील एकही गोष्ट सरकारने केलेली नाही. त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार घालत आहोत, असे सतेज पाटील म्हणाले.
अधिवेशनात विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचा जाब सरकारला द्यावा लागेल. महायुती सरकारच्या काळात राज्यावर साडेनऊ लाख कोटी रुपये कर्जाचा बोझा वाढला आहे. प्रत्येक नागरिकावर 86 हजार रुपयांचे कर्ज आहे, असे सांगतानाच महायुती सरकार हे भ्रष्टाचारी आणि 56 टक्के कमिशन सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली.
महायुती सरकार हे जनतेची, लाडक्या बहिणींची, शेतकऱ्यांची, तरुणांची फसवणूक करणारे बदमाशांचे सरकार आहे अशी टीका शिवसेना नेते–आमदार भास्कर जाधव यांनी केली. लाडकी बहीण योजना हळूहळू बंद करण्याच्या मार्गावर आहे. सरकारने 81 लाख महिलांना अपात्र केले आहे. याच महिलांच्या मतांवर महायुती सरकार सत्तेवर आले होते. या महिला ज्यांच्यामुळे अपात्र ठरल्या आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी जाधव यांनी केली.



























































