‘गोळीबारातील छर्रे अजूनही तरुणाच्या शरीरात’; FIR दाखल न केल्याने राहुल गांधी, प्रियंका गांधींचे आंदोलन- खरगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरुणाच्या शरीरात अद्याप पेलेट आणि छर्रे असूनही या प्रकरणात कोणाविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. सरकारने दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी धरणे आंदोलन करत असल्याचे खरगे यांनी सांगितले.

कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना खरगे यांनी राहुल गांधी यांच्या धरणे आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली. “सरकार एफआयआर दाखल करत नसल्याने परिस्थिती काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्या तरुणाच्या शरीरात अजूनही पेलेट आणि छर्रे आहेत. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र आतापर्यंत कोणाविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही,” असे खरगे म्हणाले.

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी घटनास्थळी धरणे आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलन सुरू करण्यापूर्वी आपण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यास सांगितले, असेही खरगे यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या आवाहनानुसार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी शांततेत आंदोलन करत असल्याचे खरगे यांनी सांगितले. ज्या व्यक्तीला पेलेट गनची गोळी लागली होती, ती व्यक्तीही आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप करत खरगे म्हणाले की, “सरकार जे सांगते ते करत नाही. त्यामुळे शेवटी आम्हाला अशी पावले उचलण्यास भाग पडते.” जनता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसकडून ही आंदोलने केली जात असल्याचेही खरगे यांनी स्पष्ट केले. सरकारने कारवाई करून पीडिताला न्याय द्यावा आणि दोषींविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी काँग्रेसची मागणी आहे.