सामना अग्रलेख – शरद पवार काय करणार?

शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नव्याने काय लिहिले व जोडले, हा पुढचा विषय, पण त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेने जी खळबळ माजली ते आत्मचरित्राबाहेरचे एक स्वतंत्र प्रकरण आहे. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. मळभ व हवा स्वच्छ केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत असा हा विषय असला तरी श्री. शरद पवार हे या घडामोडींचे नायक आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रात हालचाली सुरूच राहतील. पवार हे राजकारणातले भीष्म आहेत, पण भीष्माप्रमाणे आपण शरपंजरी पडलेले नसून सूत्रधार आपणच आहोत हे त्यांनी दाखवून दिले आहे!

शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. पवार यांच्या निकटवर्तीय म्हणवणाऱयांचे असे सांगणे आहे की, साहेब खरं तर 1 मे रोजीच म्हणजे महाराष्ट्र दिनीच निवृत्तीची घोषणा करणार होते, पण मुंबईत महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा असल्याने त्यांनी 2 मे रोजी घोषणा केली. आम्ही या मताशी सहमत नाही. आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’च्या प्रकाशन सोहळ्यासारख्या कार्यक्रमातच निवृत्तीची घोषणा संयुक्तिक आहे. आत्मचरित्र हे त्यांच्या जीवन संघर्षाचे, राजकारणाचे सार आहे. त्या पुस्तकाचे न लिहिलेले पान म्हणजे त्यांचा कालचा राजीनामा हे समजून घेतले पाहिजे. श्री. पवार यांनी त्यांचे भाषण लिहून आणले होते. असे कधी होत नाही. म्हणजे त्यांच्या भावनिक आवाहनाचा व राजीनाम्याचा मसुदा त्यांनी काळजीपूर्वक तयार करून आणला होता व त्यानुसार त्यांनी सर्व काही केले. शरद पवार यांनी वयाची 80 वर्षे कधीच पार केली आहेत व तरीही पवार हे सक्रिय राजकारणात अविरत क्रियाशील आहेत. पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्याच नावाने उभा आहे व चालला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर सभागृहातील उपस्थितांत भावनाकल्लोळ झाला. त्यात जयंत पाटील यांनीच खरे सांगितले. पाटील यांना अश्रू अनावर झाले व म्हणाले, ‘तुम्ही म्हणजेच पक्ष आहात. आम्ही तुमच्याकडे बघूनच राजकारणात आलो व तुमच्याच नावानं मतं मागतो. तुम्हीच नसाल तर आम्ही तरी पक्षात का राहायचे? आम्हीही राजीनामे देतो!’ जयंत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या व त्या खऱ्या आहेत. पवारांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याची ‘सांगता’ अशा काही धक्कादायक प्रकाराने होईल याची पुसटशी कल्पनाही नसावी. पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच अनेक प्रमुख नेत्यांनी अश्रू ढाळले, आकांत केला. पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. ‘तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी विलापी भाषा केली. पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे व पक्ष अशा तऱ्हेने फुटलेला बघण्यापेक्षा

सन्मानाने निवृत्ती

घ्यावी असा सेक्युलर विचार पवारांच्या मनात आला असेल तर त्यात चुकीचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे व राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवला. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना एका विशिष्ट परिस्थितीत केली. पवार हे काँग्रेस विचारांचे व भूमिकेचे नेते. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गावरून त्यांनी आतापर्यंतचे राजकारण केले. त्यांच्या समाजकारणाचा वाटाही मोठा आहे. पवार यांनी आतापर्यंत दोनवेळा काँग्रेसचा त्याग केला व स्वतःचा स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. कधी सत्तेत तर अनेकदा विरोधात राहून त्यांनी राजकारण केले. देशाच्या राजकारणात तब्बल 60 वर्षांपेक्षा जास्त काळ पवारांचे राजकारण सुरू राहिले. 27 व्या वर्षी ते प्रथम आमदार झाले. तेव्हापासून त्यांच्या राजकारणाचा वेग जराही कमी झालेला नाही. पवारांनी त्यांच्या पद्धतीने राजकारण केले व अनेकांचे राजकारण बिघडवले. शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नव्याने काय लिहिले व जोडले, हा पुढचा विषय, पण त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेने जी खळबळ माजली ते आत्मचरित्राबाहेरचे एक स्वतंत्र प्रकरण आहे. माणसाला जास्त मोह नसावा व कधीतरी थांबायला हवे हे खरेच, पण राजकारणातला मोह कुणाला सुटला? धर्मराज व श्रीकृष्णालाही सुटला नाही. पंतप्रधान मोदी तर स्वतःला फकीर मानतात. मात्र त्यांनाही राजकीय मोहमायेने जखडून ठेवले आहे. त्यात पवार हे पूर्णवेळ राजकारणी. अशा राजकीय माणसाने राजीनामा देऊन खळबळ उडवावी यामागचे राजकारण काय? याचा शोध काही जण घेऊ लागले तर आश्चर्य नाही. पक्षातील ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता व त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे काय? हा पहिला प्रश्न. दुसरे म्हणजे, अजित पवार व त्यांचा गट

वेगळी भूमिका

घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले आहे काय? हा दुसरा प्रश्न. शिवसेना फुटली. चाळीस आमदार सोडून गेले, पण संघटन व पक्ष जागेवरच आहे. उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार वगैरे गेले तरी जिल्हा स्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी यादृष्टीने जनमानस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो. शरद पवार यांनी राजीनामा देताच त्यांची मनधरणी सुरू झाली हे स्पष्ट दिसते. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी नेते करीत असताना अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली. ‘पवारसाहेबांनी राजीनामा दिला. ते मागे घेणार नाहीत. त्यांच्या संमतीने दुसरा अध्यक्ष निवडू,’ असे अजित पवार म्हणतात. हा दुसरा अध्यक्ष कोण? पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत व पवारांचा पक्ष हा महाराष्ट्र केंद्रित आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळण्याचा वकुब असलेला नेता निवडताना काळजी घ्यावी लागेल. अजित पवारांच्या राजकारणाचे अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे आहे. सुप्रिया सुळे दिल्लीत असतात. त्यांचा तेथील वावर चांगला आहे. संसदेत त्या उत्तम काम करतात, मात्र भविष्यात त्यांना पक्षाचे नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. राज्यातील अनेक नेते आज कुंपणावर आहेत व त्यातील अनेक नावे पवारांच्या पक्षातली आहेत. याच कुंपणावरच्या काही नेत्यांनी पवारांच्या राजीनाम्यानंतर सगळय़ात जास्त विलाप केला. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळय़ांना उघडे केले. मळभ व हवा स्वच्छ केली. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत असा हा विषय असला तरी श्री. शरद पवार हे या घडामोडींचे नायक आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रात हालचाली सुरूच राहतील. पवार हे राजकारणातले भीष्म आहेत, पण भीष्माप्रमाणे आपण शरपंजरी पडलेले नसून सूत्रधार आपणच आहोत हे त्यांनी दाखवून दिले आहे!