
देशातील ढासळलेली आर्थिक स्थिती, न्यायपालिकेने सरकारला दिलेला सल्ला, राज्यातील दुष्काळी स्थिती, साखर-दुधाची दरवाढ,विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सरकारनं स्वीकारलेलं धोरण कसं चुकीचं आहे, हे न्यायदेवतेने स्पष्टपणे सांगितलं आहे. वर सरकारला कडक शब्दात सल्लाही दिला आहे की, तुम्ही विद्यार्थी प्रश्नांबाबत निर्णय नाही घेतले तर आम्हाला निर्णय घ्यावे लागतील. आता न्यायपालिका प्रशासकीय अधिकार आपल्या हाती घेते की काय ह्याची चिंता वाटावी अशी स्थिती सरकारने आणलेली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. शरद पवार यांनी बारामतीत माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले की,आज देशाची जी अर्थव्यवस्था खाली जातेय त्याची नोंद पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी घेतलेली दिसत नाही. त्या वस्तुस्थितीपासून लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय पातळीबाबत विधानं करत आहेत पण लोकांना मात्र महागाईच्या झळा बसत आहेत,देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री देशाचं चित्र सुदृढ आहे असं भासवायचा प्रयत्न करत आहेत. पण देशाच्या अर्थव्यवस्थेचं मूळ जे दुखणं आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आणि त्यामुळे लोकांच्या खिशावर बोजा पडतोय, महागाई वाढतेय,असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, राज्यावर दुष्काळाचं सावट जाणवतंय. सबंध मराठवाडा हा दुष्काळाने होरपळून निघेल असा दिसतोय म्हणून सगळ्यांनी मिळून आपल्या संकटग्रस्त बांधवांना ह्या संकटातून बाहेर काढायला हातभार लावला पाहिजे,साखरेच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा व्हायला हवा पण तसं चित्र अजून दिसत नाही. वाढत्या दराचा काही हिस्सा जो पिकवतोय त्यांच्याकडे गेला पाहिजे,असेही शरद पवार साहेब म्हणाले.
शरद पवार म्हणाले की,बारामतीत Artificial Intelligence ची देशातली पहिली इन्स्टिट्यूट उभी राहिली आहे. त्याबद्दलची माहिती देण्यासाठी, जाणून घेण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना निमंत्रित केलं आहे,दुधामधली भेसळ आता थांबली आहे. ज्यामुळे दुधाची उपलब्धता मर्यादित आहे. पण भेसळमुक्त दूध चांगलं असल्यामुळे ग्राहक सुद्धा दोन पैसे जास्त द्यायला तयार आहेत, हे चित्र वाईट नाही, असेही शरद पवार यांनी नमूद केले.



























































