
देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील जवान वैभव तात्यासाहेब आवताडे (वय – 31) यांना वीरमरण आले. हिंदुस्थानी लष्कराच्या मराठा सिग्नल रेजिमेंटमध्ये ते कार्यरत होते. त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती शुक्रवारी दुपारी कुटुंबीयांना मिळताच गणेशवाडीसह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत वैभव आवताडे 11 वर्षांपूर्वी हिंदुस्थानी लष्करात भरती झाले होते. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी नेहमीच आपल्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. जम्मू येथील आव्हानात्मक वातावरणात सेवा बजावत असताना त्यांना सर्वोच्च बलिदान द्यावे लागले.
काही दिवसांपूर्वीच सुट्टी संपवून ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते. 13 ऑगस्टच्या रात्री सुमारे 11 वाजता त्यांनी पत्नी, आई आणि वडिलांशी फोनवर संवाद साधला होता. कुटुंबीयांची आपुलकीने चौकशी करणारा हा संवाद त्यांचा शेवटचा ठरेल, याची कल्पनाही त्यावेळी कोणी केली नव्हती.
वीर जवान वैभव आवताडे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी दिपाली, 3 वर्षांची मुलगी देवांशी आणि 1 वर्षाचा मुलगा देवांश असा परिवार आहे. अवघ्या सहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या अकाली जाण्याने दोन्ही चिमुकल्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना मंगळवेढा (जि. सोलापूर) तालुक्यातील गणेशवाडी गावचे सुपुत्र आणि मराठा रेजिमेंटचे वीर जवान वैभव आवताडे यांना वीरमरण आल्याचं वृत्त हे अत्यंत वेदनादायी आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली!… pic.twitter.com/SeFNnIkvYd
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 16, 2026
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
मिळालेल्या माहितीनुसार, वीर जवान वैभव आवताडे यांचे पार्थिव विशेष विमानाने पुणे येथे आणले जाईल. तेथून लष्करी वाहनाने त्यांच्या मूळ गावी गणेशवाडी येथे आणण्यात येईल. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील.

























































