
पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘टीयूआय-21’ या वाघिणीला गुराढोरांची शिकार केल्यामुळे वन विभागाने बुधवारी रात्री पुन्हा एकदा जेरबंद केले. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी तिला अवघ्या महिनाभरापूर्वीच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते, परंतु तिने पुन्हा शिकार सुरू केल्याने ही कारवाई करण्यात आली. तिला पूर्वी सोडले होते त्याच ठिकाणावरून पकडण्यात आले.
यापूर्वी 7 जुलै रोजी ‘टीयूआय-21’ वाघिणीला पवनार/पवनी युसी क्षेत्रातील उसरीपार बीटमधून पकडण्यात आले होते. मानवी वस्तीजवळ येऊन पाळीव जनावरांची शिकार करण्याची तिची सवय कायम असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वैद्यकीय तपासणीनंतर तिला सिल्लारी क्षेत्रातील मुख्य संरक्षित जंगलात सोडण्यात आले होते.
मात्र जंगलात सोडल्यानंतरही वाघिणीच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. तिने लगतच्या परिसरात पुन्हा गुराढोरांची शिकार करणे सुरू केले. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.































































