
बैलपोळ्यांच्या सणापूर्वी शेतातील तळ्यात बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी जिंतूर तालुक्यातील चामणी येथे घडली. यश बबन साळवे (११) आणि आदिनाथ बबन साळवे (९) अशी मृत भावांची नावे आहेत. या घटनेने चामणी गावावर शोककळा पसरली आहे.
बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतातील बैलांची धुणी व ‘खांदे मळणी’ करण्यासाठी आजोबा दोन्ही नातवंडांना घेऊन तळ्याकडे गेले होते. बैल धुण्याची तयारी सुरू असतानाच आजोबा काही कारणास्तव तळ्यापासून काही अंतरावर गेले. त्याचवेळी आदिनाथ पाण्यात बुडू लागला. भावाला वाचविण्यासाठी यशने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात यशदेखील पाण्यात पडला आणि दोघेही पाण्यात बुडाले.
आजोबा वयोमानामुळे तत्काळ पाण्यात उतरून दोन्ही नातवंडांना वाचवू शकले नाहीत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले.
दोन्ही भावांच्या मृत्यूची वार्ता समजताच ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला. बैलपोळ्याच्या सणाची तयारी सुरू असतानाच एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू झाल्याने साळवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चामणी गावातही हळहळ व्यक्त होत आहे.




























































