
टीईटी पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन करून भाजपा महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या प्रवेश द्वारावर आंदोलन करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
रविवारी होणाऱ्या टीईटीचा पेपर शनिवारी ठाण्यात फुटल्याने ही परीक्षा रद्द करावी लागली, यामुळे लाखो परिक्षार्थींचे नुकसान झाले आहे. भारतीय जनता पक्ष महायुतीचे सरकार एक परिक्षाही व्यवस्थित घेऊ शकत नाही. सातत्याने पेपर फुटत असून प्रामाणिक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते आहे. मागील महिन्यात नीटचा पेपर फुटल्याने देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असतानाच टीईटीचाही पेपर फुटल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाने पेपरफुटीप्रकरणी आक्रमक भूमिका घेत भाजपा सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. काल रात्री सागर साळुंखे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI ने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवण्यात आले, त्याआधी रविवारी मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्त्वाखाली शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या सरकारी निवासस्थावर हल्लाबोल केला. आणि आता पुन्हा युवक काँग्रेसने आंदोलन केले आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.





























































