
मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधकांनी गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत उपस्थित केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला २९ जून रोजी या घटनेबाबत सभागृहात निवेदन देण्याचे निर्देश दिले.
काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी ही घटना ‘अत्यंत गंभीर’ असल्याचे म्हटले आणि सांगितले की, दररोज सुमारे ८० लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरून प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षेशी हा विषय जोडलेला आहे. त्यांनी ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आणि संरक्षणाबाबत चर्चेची मागणी केली.
पटोले म्हणाले की, पीडित प्रवाशाच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला असून त्यांना तातडीने न्याय मिळायला हवा. ‘सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाही मुंबईत अशी गंभीर घटना घडणे दुर्दैवी आहे. सरकारने या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि केलेल्या कारवाईची माहिती सभागृहाला द्यावी,’ असे ते म्हणाले.
सभागृहातील सदस्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेत नार्वेकर यांनी सांगितले की, या घटनेकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. ‘या विषयाचे गांभीर्य आणि सभागृहातील सर्वच सदस्यांनी व्यक्त केलेली चिंता लक्षात घेता, सरकारने सोमवारी (२९ जून) या घटनेची सविस्तर वस्तुस्थिती, तपासाची प्रगती आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजनांची माहिती देणारे निवेदन सादर करावे’, असे नार्वेकर म्हणाले.
पावसात लोकलचे दरवाजे उघडे ठेवायचे की नाही यावरून झालेल्या वादात, मुंबई लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षांच्या एका प्रवाशाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर हा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला.
आरोपी सचिन रमेश सुवर्णा (३०) याने मंगळवारी रात्री पश्चिम उपनगरातील अंधेरी आणि बोरीवली रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात चाकू काढून मयंक लोहार याच्यावर प्राणघातक वार केले. या घटनेच्या काही तासांनंतर, मिरा रोड परिसरात राहणाऱ्या सुवर्णा याला नवी मुंबईतील पनवेल येथून अटक करण्यात आली, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.






























































