
देशातील तीन पोटनिवडणुकांचे निकाल लागले आहेत त्यात आश्चर्य वाटावे असे काही झालेले नाही, असे म्हणत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यासंदर्भात अधिक बोलताना राऊत म्हणाले, ‘बिहारमधील जी जागा आहे बांकीपूर, ती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि त्यांचे वडिल हे 1995 सालापासून ती जागा जिंकताहेत. हा भाजपचा गड असलेली जागा प्रशांत किशोर यांच्याकडून गमावली आहे. या जागेबद्दल भाजपला किती आत्मविश्वास असावा. तर भाजपचे नेते प्रचाराच्या दरम्यान काय म्हणाले. बांकीपूरला कुत्रा आणि मांजराला जरी भाजपने उभे केले तरी मत देतील. म्हणजे पाहा मतदारांना किती गृहीत धरतात’. पोटनिवडणुकांमधील भाजपच्या पराभवाची कारणे संजय राऊत यांनी यावेळी सांगितली. तसेच या देशातील राजकीय परिस्थिती आणि जनतेत असलेली भावना याचा अंदाज समोर आल्याचेही त्यांनी सांगितले.
‘भाजपचा अहंकार लोकांनी मोडून काढला. मध्यप्रदेशातील दतिया विधानसभा काँग्रेसची होती. ती घेण्यासाठी भाजपने साम दाम दंड भेद सर्व वापर केला. गुजरातमधली जागा जिंकली त्यात काही विशेष नाही. या तिन पोटनिवडणूकाचे निकाल यातील दोन महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे फार मोठी क्रांती झाली असं म्हणणाऱ्यातले आम्ही नाही किंवा मिनी जनरल निवडणूक आहे असंही मी म्हणणार नाही. पण लोकांचा कल दिसतो आहे. मोदीची किंवा भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता किती घसरली हे तुमच्या बालेकिल्ल्यातील पराभवावरून दिसते असे म्हणत राऊतांनी सडकून टीका केली.
बांकीपूर पोटनिवडणूकी निकालाबद्दल बोलताना राऊत म्हणाले, बांकीपूर मध्ये 95 पासूनचा गड तुम्हाला गड राखता आला नाही. याचा अर्थ 64 टक्के लोकांनी आपल्या विरोधामध्ये मतदान केलं आहे. जे आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाला मतदान करत होते. त्यांनी एक पर्याय निवडला हे सुद्धा महत्त्वाचे. हवापालट होताना दिसतेय, असे संजय राऊत म्हणाले.
‘डीएमके किंवा एआयडीमके यापेक्षा एका वेगळ्या पक्षाच्या मागे तमिळनाडू मधील लोक गेले. प्रशांत किशोर बिहारच्या विधानसभेत पूर्णपणे पराभूत झाले होते. त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. प्रशांत किशोर यांनी या जागेवर लक्ष केंद्रीत केलं त्यांनी उत्तम प्रचार केला. विशेषतः या सर्वासाठी जबाबदार भारतीय जनता पक्षाचं लोकांना गृहीत धरण्याचं राजकारण आहे. बिहारच्या मुख्यमंत्री पदी एक अशिक्षित गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस बेशक नेमून भारतीय जनता पक्षाने बिहारच्या मतदारांचा आणि जनतेचा अपमान केला. आम्ही कोणालाही नेमू शकतो, तेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं. एक भ्रष्ट कॅमेऱ्यासमोर पैसे घेणारा आणि त्याची खिल्ली मोदींनी उडवली. त्याला पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री नेमला’, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.




























































