हे पूर्णपणे अडाण्यांचे सरकार, इथेनॉल उत्पादनाच्या धोरणावरून अरविंद केजरीवाल यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उसापासून इथेनॉल निर्मिती करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशात साखरेचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप करत, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “हे सरकार पूर्णपणे अडाणी लोकांकडून चालवले जात आहे”, असा टोला त्यांनी लगावला.

X वर पोस्ट करत अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, तेल आयातीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवण्यासाठी सरकारने उसापासून मोठ्या प्रमाणावर इथेनॉल बनवण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की देशात साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि आता साखरेची ही कमतरता भरून काढण्यासाठी सरकार त्याच परकीय चलनाद्वारे साखर आयात करणार आहे. कोणताही निर्णय घेतल्यावर त्याचे काय परिणाम होतील, याचे भान सरकारला नाही, अशी टीका त्यांनी केली.

अरविंद केजरीवाल हे E20 धोरणाविरोधात सातत्याने मोहीम राबवत असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर नागरिकांचा आवाज दाबण्याचा आरोप केला. सोशल मीडियावर E20 धोरणावर टीका करणाऱ्यांचे व्हिडीओ हटवले जात असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असल्याचा दावाही त्यांनी एका व्हिडीओद्वारे केला. तसेच १४० कोटी जनतेला जबरदस्तीने E20 बरोबर आहे, हे मान्य करायला लावले जात आहे, असे ते म्हणाले. पेट्रोल पंपांवर ग्राहकांना पारंपरिक पेट्रोल आणि इथेनॉल मिश्रित इंधन यापैकी निवड करण्याचा पर्याय मिळावा, अशी मागणी आपने केली आहे.