मोदी-शहांचा सूर्य मावळतीला लागलाय, सरसंघचालकांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा एक व्हिडीओ आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सरसंघचालक अहंकारी व्यक्तीचा उदय आणि अस्त निश्चित असल्याचे म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना संजय राऊत यांनी आरएसएस, भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ‘चढता सूरज धीरे धीरे ढलाता है..ढल जायेगा…ढल जायेगा..ढल जायेगा…’, अशा गाण्याच्या ओळी शेअर केल्या आहेत. या ओळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला लागू असल्याचे संजय राऊत शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

‘चढता सूरज धीरे धीरे ढलाता है..ढल जायेगा…ढल जायेगा..ढल जायेगा…’, हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला लागू असून त्यात लपवायचे काय. स्वत: सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदींना उद्देशून विधान केले आहे. सूर्य उगवतो, तसा मावळतोही आणि यांच्या माळवण्याची सुरुवात झाली आहे. देशामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. यूपीआय संदर्भात लोक रस्त्यावर असून लोकांनी बंड केले आहे. लोक हा जबरदस्तीचा भार सहन करायला तयार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.

यूपीआयवरील पेमेंट शुल्क ही अमेरिकेला दिली जाणारी खंडणी आहे. हे प्रोटेक्शन मनी आहे. एपस्टीन फाईलमधील महत्त्वाच्या फाईल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उघड करू नये म्हणून हिंदुस्थानकडून दिली जाणारी ही खंडणी आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थान दबावात असून मोदी कोमात केले आहे. ते या विषयावर जास्त बोलतही नाहीत. यूपीआय पेमेंटवरील शुल्क हे ट्रम्पला प्रोटेक्शन मनी देण्यासारखे आहे. एपस्टीन फाईलमधील काही पानं ट्रम्पने उघड केली तर हिंदुस्थानात भूकंप होईल. तसा भूकंप होऊ नये म्हणून आपण त्यांना प्रोटेक्शन मनी अर्थात खंडणी देत आहोत. दर दिवशी हजारो कोटी अमेरिकेला जात आहेत. त्यामुळे महागाई वाढणार असून लोक रस्त्यावर येतील आणि पीएम हाऊसपर्यंत जातील.

अहंकारी व्यक्तीचा उदय आणि अस्त निश्चित! सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान, रोख कुणाकडे?

देशात काय चालले आहे हे सरसंघचालकांनाही माहिती आहे. त्यामुळे त्यांनी सूर्यास्ता संदर्भात सूचक विधान केले. देश त्या दिशेनेच चालला असून मोदींना 2029 पूर्वी राजीनामा द्यावा लागाले. त्यांची सर्वच बाबतीत कोंडी झालेली आहे. काल मी त्यांच्या ग्रहदशेविषयी लिहिले तेव्हा भाजपचा फार मिरच्या झोंबल्या. त्यांनी मोदींची खोटी जन्मकुंडली टाकली. त्या माणसाचाही जन्म झाला आहे, तो काय नॉन बायोलॉजिकल आहे का? ते काय विष्णुचा अवतार आहेत का? तेही माणूसच असून तेही दमतात, थकतात, चुका करतात, खोटं बोलतात आणि लोकांना फसवतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.