
पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे तृणमूल काँग्रेस हे नाव आणि गवत-फुल हे चिन्ह गोठवले. एवढेच नाही तर काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना अटक करण्यात आली. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. पश्चिम बंगालमधील या घडामोडींवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून निवडणूक आयोगासह भाजपवर सडकून टीका केली. निवडणूक आयोग हा अमित शहांच्या घरगडी असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना नवीन नाव आणि नवीन चिन्ह देण्यात आले. काँग्रेस उमेदवारालाही अटक करण्यात आली. याबाबत विचारण्यात आले असता संजय राऊत म्हणाले की, देशाचा निवडणूक आयोग हा अमित शहांचा घरगडी आहे. अशा पद्धतीने निर्णय देताना त्यांना लाज वाटली पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, 1-12 वर्षांपूर्वीचे एक आंदोलनाचे प्रकरण आहे. त्या आंदोलनाचे नेतृत्व सध्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केले होते. त्या आंदोलनामध्ये हे काँग्रेसचे उमेदवार सामील होते. निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही त्यांना अटक करता, ही कोणती लोकशाही आहे? कोणत्या लोकशाहीत, देशात आम्ही राहत आहोत? निवडणूक लढू नये म्हणून उमेदवाराला अटक करायची, हे लोकशाहीचे भेसूर चित्र आहे. मिस्टर मोदी, पश्चिम बंगाल हा हिंदुस्थानचाच भाग आहे, असे संजय राऊत म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान, ममता बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पक्ष स्थापन केला आणि बंगालमध्ये राज्य केले. गवत-फुल हे चिन्ह स्वत: ममता बॅनर्जी यांना चितारलेले आहे. त्या स्वत: यांच्या चित्रकार आहेत. ते तुम्ही जप्त करत आहात. आमच्या वेळाला आम्ही सांगत होतो की चिन्ह गोठवा तेव्हा गोठवले नाही. पण आता गोठवले. घड्याळ चिन्ह गोठवले नाही, पण तृणमूल काँग्रेसचे चिन्ह गोठवले. इतका बेमुर्ततखोर निवडणूक आयोग देशाच्या इतिहासात झाला नसेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मोदी-शहांचा सूर्य मावळतीला लागलाय, सरसंघचालकांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊत यांचा हल्लाबोल


























































