अबब… हनुमान जयंतीच्या प्रसादासाठी ग्रामस्थांनी तीन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी, व एक हजार किलो कांद्याची चटणी

आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील ग्रामदैवत हनुमानाचे जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षी थोरांदळे गावात मोठा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक उपस्थित असतात. येथील पुरी गुळवणीच्या महाप्रसादाची आगळी वेगळी परंपरा शेकडो वर्षांची असून आजही टिकून आहे. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी गावातील सर्व महिला, पुरुष, जेष्ठ मंडळी एकत्र येऊन पुऱ्या गुळवणीचा महाप्रसाद तयार करतात . यासाठी यंदा ग्रामस्थांनी मानसी एक आठवा व उंबऱ्यामागे दोन आठवे ( शेरभर ) गहू गोळा करून तो एकत्र करून पुन्हा वाटला. सोमवारी (दि. 22)रोजी दुपारी पुऱ्या लाटण्याच्या कामाला महिलांनी सुरुवात केली . पुरुष मंडळी पुऱ्या तळण्याचे काम करत आहे . तर गावातील जेष्ठ मंडळी चटणीसाठी कांदा चिरण्याचे काम करतात.हे आज संध्याकाळ उशिरा पर्यंत चालू राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

यंदा महाप्रसादासाठी तब्बल तीन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी, व एक हजार किलो कांद्याची चटणी तयार करण्याचे काम चालू आहे. या महाप्रसादासाठी गावातील ग्रामस्थ एकत्र येत असतात . तयार झालेला महाप्रसाद हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जन्माच्या कीर्तनानंतर उपस्थित ग्रामस्थ व पै – पाहुण्यांना खाऊ घातला जातो . हनुमान जयंती निमित्त ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . यंदाचे 45 वे वर्ष आहे . मंगळवारी (दि. 23 ) रोजी पहाटे 5 ते 7 ह . भ. प . विलास महाराज मिंडे यांचे हनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर शेरणी वाटपानंतर, भाविकांना ‘पुरी – गुळवणीचा महाप्रसाद वाटण्यात येणार आहे. दुपारी थोरांदळे ग्रामस्थ व जय हनुमान व्यायाम शाळा यांच्या वतीने कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे . त्यानंतर सायंकाळी 7 वाजता तरुण मित्र मंडळाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.