
छत्तीसगडमधील कांकेर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार भोजराज नाग यांनी आपण लिंबू कापून देवाकडे प्रार्थना केली त्यामुळे पाऊस थांबवल्याचा अजब दावा केला आहे. याआधीही त्यांनी अशा प्रकारे लिंबू कापून कामं केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला आहे. तसेच जर लिंबू कापून पाऊस थांबत असेल तर त्यांनी साखरेच्या किंमती कमी करण्यासाठी देखील एक लिंबू कापावा”, असा टोला काँग्रेस नेते दीपक बाजी यांनी लगावला आहे.
”त्या दिवशी बालोदमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. मला माहिती मिळाली की मुख्यमंत्री पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करायला येणार आहेत. त्यामुळे मी बुधादेव व महादेवासमोर लिंबू कापला व पाऊस थांबू दे अशी प्रार्थना केली. त्यानंतर पाऊस थांबला”, असे नाग यांनी दौंदीलोहारा येथील एका सभेत सांगितले.
नाग यांनी याआधी देखील लिंबू कापणे, झाड फुंकणे, भूत काढणे अशा प्रकारची व्यक्तव्य केली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावाने लिंबू कापेन असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याने तेव्हा वाद निर्माण झाला होता.



























































