सिमेंट काँक्रिटचा रस्ता मुदत संपूनही अपूर्ण मग रत्नागिरी नगर परिषदेने नोटीस का काढली नाही? युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहरातील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण झाले का? अजून रस्त्याचे काम पूर्ण झाले नसेल तर संबंधित ठेकेदाराला रत्नागिरी नगरपरिषदेने नोटीस पाठवली का असा सवाल युवासेनेचे जिल्हायुवाधिकारी प्रसाद सावंत यांनी विचारला आहे.

रत्नागिरी शहरातील 100 किमी रस्ते काँक्रिट करण्याचा गाजावाजा करणाऱ्या नगर परिषदेचा कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. या काँक्रिट रस्त्यांच्या निकृष्ट दर्जा आणि नियोजनशून्य कामामुळे सामान्य रत्नागिरीकरांचा जीव धोक्यात आला असून, यावर प्रसाद सावंत यांनी नगर परिषदेला थेट जाब विचारला आहे. फुटपाथ मोकळे करण्यासाठी गरीब विक्रेत्यांवर कारवाई करणारी नगर परिषद, काँक्रिट रस्त्यांच्या घोळावर मात्र मूग गिळून गप्प का आहे? असा सावंत यांनी केला.

पूर्वीच्या डांबरी रस्त्यांपेक्षा काँक्रिट रस्ते अरुंद झाले आहेत. दोन एसटी बसेस एकमेकांना पास होऊ शकत नाहीत. यात सामान्य नागरिक भरडला जातोय, याचे दुःख नगर परिषदेला दिसत नाही का? काँक्रिट रस्त्याच्या बाजूला पेवर ब्लॉक टाकायचे होते, त्याला किती महिने झाले? साईडपट्टी अर्धवट असल्याने किती अपघात झाले? याला जबाबदार कोण? नगर परिषद की ठेकेदार? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.मारुती मंदिर सर्कलला कोबल स्टोन (दगडी) रस्ता का बनवला? याची सध्याची अवस्था नगर परिषदेने पाहिली का? कोबल स्टोनचा हा घाट कोणासाठी घातला? असा सवाल प्रसाद सावंत यांनी उपस्थित केला आहे.