
राज्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून जे राजकारण सुरू आहे ही एकप्रकारे लोकशाहीची हत्या आहे. पक्षांतरविरोधी कायदा तर कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासारखा झालाय, अशी खंत माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
लोकशाही विकली जात असून खासदार-आमदारांना कोट्यवधी रुपयांना खरेदी केले जात आहे. शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत पक्ष बदलला. ५० कोटींना आमदारांना खरेदी केले गेले. पक्षांतरविरोधी कायदा कुणी मानतच नसून या कायद्याचा धाकच राहिलेला नाही. सर्वोच्च न्यायालय या सर्व प्रकरणांवर कोणताही निर्णय देत नसल्याचा गैरफायदा सध्या राजकारणात उठवला जात असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जो पक्ष बदल केला तो पक्ष बदलणे कायद्याने योग्य आहे की नाही. पक्ष बदलणाऱ्या आमदारांची आमदारकी रद्द करण्याबाबत किंवा या प्रकरणात पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन झाले की नाही यासंदर्भात कोणताच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाही. यासंदर्भात निर्णय देण्यापासून सर्वोच्च न्यायालयाला रोखल गेले. शिंदे गटाकडून त्याचाच फायदा राजकारणात उठविला जात असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
सचिन अहिर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे
शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या सचिन अहिर यांनी पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन केले असून त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे. एक सदस्य जरी पक्ष बदलत असेल तरी त्याचे सदस्यत्व रद्द झालेच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.




























































