
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठ्याने 90 टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शहराच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या हायड्रॉलिक इंजिनिअर विभागाच्या भांडुप कॉम्प्लेक्स येथील मास्टर कंट्रोल सेंटरने 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 वाजता नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये त्यांच्या एकूण उपयुक्त पाणीसाठ्याच्या 90.26 टक्के पाणीसाठा आहे. 12 ऑगस्ट रोजी हा साठा 89.49 टक्के होता. त्यामुळे 24 तासांत पाणीसाठ्यात 0.77 टक्क्यांची वाढ झाली आहे.
13 लाख कोटी लिटरहून अधिक पाणीसाठा
मुंबईच्या सात तलावांची एकूण उपयुक्त पाणीसाठवण क्षमता 14,47,363 दशलक्ष लिटर आहे. 13 ऑगस्टच्या सकाळपर्यंत या तलावांमध्ये सुमारे 13,06,364 दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे. हा एकूण क्षमतेच्या 90.26 टक्के आहे.
तलावांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईच्या जलसाठ्यात सातत्याने भर पडत आहे.
कोणत्या तलावात किती पाणीसाठा?
मध्य वैतरणा – 93.72 टक्के
भातसा – 88.07 टक्के
उर्ध्व वैतरणा – 81.45 टक्के
मोडक सागर – 83.63 टक्के
तानसा – 99.18 टक्के
विहार – 100 टक्के
तुळशी – 100 टक्के
विहार तलाव 7 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला. त्याच दिवशी तुळशी तलावानेही ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात केली. त्यानंतर 22 जुलै रोजी तानसा धरण, तर 23 जुलै रोजी मोडक सागर ओसंडून वाहू लागला.
24 तासांत तलावांच्या पाणलोट क्षेत्रात किती पाऊस?
13 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या 24 तासांत विविध तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद झाली.
मध्य वैतरणा येथे 25 मिमी, उर्ध्व वैतरणा 26 मिमी, भातसा 11 मिमी, विहार 3 मिमी, तुळशी 7 मिमी, तानसा 12 मिमी आणि मोडक सागर येथे 35 मिमी पाऊस झाला.
मुंबई आणि तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने सातही तलावांमधील पाणीसाठा आता 90 टक्क्यांहून अधिक झाला आहे. त्यामुळे आगामी काळातील मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही स्थिती समाधानकारक मानली जात आहे.

























































