तुमची कुंडली बाहेर काढायला लावू नका नीलेश लंके यांचा इशारा

आतापर्यंत तुम्हाला पचले असेल. मला तुमची कुंडली काढायला लावू नका. तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाळता येत असतील. पण, वेळ आली तर हे गुंड पाय लावून पळून जातील. दुसरीकडे माझ्याकडे असंख्य जिवाभावाचे सहकारी आहेत. पाळणारे गुंड किती पुढे येतात हे मलाही माहिती आहे. माझे सहकारी पळाले तर मी नाव बदलून ठेवील, असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी केडगावातील गुंडगिरी हद्दपार करण्याची ग्वाही दिली.

नगर लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ केडगाव उपनगरात प्रचारफेरी तसेच कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नीलेश लंके बोलत होते.

लंके म्हणाले, ‘आपण ग्रामपंचायत, महानगरपालिका, विधानसभेच्या निवडणुकीत गांभीर्याने मतदान करतो. लोकसभेची निवडणूक देशाच्या हितासाठी महत्त्वाची असते. देशाचे भवितव्य घडविणारी ही निवडणूक असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान वाचविण्याची ही निवडणूक आहे. आज देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. न्यायदेवता म्हणून आपण ज्या संस्थेकडे पाहतो, त्या न्यायसंस्थेला हुकूमशाहीच्या चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर त्याच पद्धतीने न्यायव्यवस्थेकडून निकाल दिला जातो. केंद्रीय एजन्सीचा वापर करून विविध राज्यांत सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला जातो. ईडी, सीबीआयचा वापर करून राजकारण्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चांगले काम करणारे मुख्यमंत्री असताना त्यांनाही तुरुंगात डांबले जात असल्याचा आरोप लंके यांनी केला.’

निवडणुकीला सामोरे जाताना पाच वर्षांत तुम्ही ज्या घोषणा दिल्या, त्या अजेंडय़ावर मते मागणे आपेक्षित आहे. पाच वर्षांच्या काळात काय काम केले, हे जनतेपुढे मांडले पाहिजे. मात्र, विकासाचा काही मुद्दा नाही. त्यामुळे मतदारसंघात साखर, डाळीचे वाटप करण्यात आले. प्रत्येक भागात चार डफडेवाले ठेवण्यात आले असल्याचा आरोप लंके यांनी केला.