सरकार विषकन्येसारखे… सरकारी हस्तक्षेपामुळे प्रकल्प उद्धवस्त होऊ शकतात; नितीन गडकरींच्या विधानाची चर्चा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्पष्टपणे आपली भूमिका मांडतात. विरोधकांना टीकेचे लक्ष्य करताना ते सरकारच्या चुकाही परखडपणे मांडतात. त्यामुळे गडकरी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. तसेच या परखड वक्तव्यांमुळे ते चर्चेतही असतात. आताही ते एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी सरकारला उल्लेख विषकन्या असा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.

आजच नाही, तर मी विरोधी पक्षात असतानाही आपण एक गोष्ट ठामपणे सांगायचो. लोकांचा देवावर आणि सरकारवर विश्वास आहे. पण सरकारी हस्तक्षेपामुळे प्रकल्प उद्ध्वस्त होऊ शकतात. सरकारचा हस्तक्षेप किंवा सरकारची सावलीही प्रकल्पाला उद्ध्वस्त करू शकते. सरकार विषकन्येसारखे आहे. जे सरकारपासून दूर राहतात त्याची प्रगती होते, असे वक्तव्य गडकरी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा होत आहे.

कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने नागपुरात आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, सरकारच्याही अनेक अडचणी आहेत. देशाचे कृषी उत्पन्न 22 टक्क्यांनी वाढवायचे आहे आणि ज्या दिवशी आपण हे करू, त्या दिवशी शेतकऱ्यांची मजुरी 1500 होईल. हे सर्वात मोठे ध्येय आपल्यासमोर आहे. सरकारमधील अडचणी वेगळ्या आहेत. या वर्षी एमएसपी देताना अडचणी आल्यात. बाजारभाव आणि एमएसपी यांच्यात समतोल साधण्यासाठी बाजारभाव कमी आणि एमएसपी जास्त आहे. सरकारला दीड लाख कोटी रुपये द्यावे लागतील आणि घेतलेले धान्य ठेवण्यासाठी गोदाम नाहीत. मंत्री असल्याने मलाही बोलण्याच्या मर्यादा आहेत, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.