पाकिस्तानाकडून अफगाणिस्तान सीमेवर हवाई हल्ले, २९ दहशतवादी ठार केल्याचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pakistan-launches-air-strikes-on-afghanistan-border-29-terrorists-killed-karachi-rangers-revenge

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर राबवलेल्या एका मोहिमेत किमान २९ दहशतवादी मारले गेल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. हे हल्ले शनिवारी कराचीतील निमलष्करी दल असलेल्या ‘रेंजर्स’च्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर करण्यात आले, अशी माहिती माहिती मंत्री अत्ता तरार यांनी सोमवारी दिली.

तरार यांनी याला दुजोरा दिला की, हे हल्ले पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काळात खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान आणि कराचीतील पाकिस्तान रेंजर्स (सिंध) कॅम्पविरुद्ध झालेल्या अनेक दहशतवादी घटनांच्या प्रत्युत्तरात करण्यात आले आहेत.

ते म्हणाले, ‘सुरक्षा दलांनी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर गुप्तचर माहितीच्या आधारे एक सुनियोजित मोहीम राबवली; ज्यानंतर जमात-उल-अहरार आणि फितना अल-ख्वारीज या संघटनांच्या दहशतवाद्यांचे अड्डे आणि सुरक्षित ठिकाणांवर अचूक हल्ले करण्यात आले, ज्यात एकोणतीस दहशतवादी मारले गेले’.

‘२८ जून २०२६ रोजी सुरक्षा दलांनी खैबर पख्तुनख्वाच्या बाजौर जिल्ह्यात पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ दहशतवाद्यांच्या एका गटाविरुद्ध गुप्तचर माहितीवर आधारित ही मोहीम राबवली’, असे ते म्हणाले.

‘ऑपरेशन गझब लील हक’ चा पुढील भाग म्हणून, विश्वसनीय गुप्तचर माहितीच्या आधारे २८-२९ जूनच्या रात्री पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमाभागात जमात-उल-अहरार आणि फितना अल-ख्वारीज या दहशतवादी संघटनांच्या कॅम्प्सवर आणि अड्ड्यांवर हल्ले करण्यात आले आहेत.

याआधी कराचीतील रेंजर्सच्या इमारतीवर झालेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले होते, तर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तराच्या गोळीबारात तीन हल्लेखोरांना ठार केले आणि एक दहशतवादी जखमी झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

बंदी घातलेल्या जमात-उल-अहरार या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी बंडखोराने तपासादरम्यान सांगितले की तो अफगाणिस्तानचा रहिवासी आहे, जिथे या हल्ल्याचा कट रचला गेला होता आणि बाजौरमधील एका स्थानिक दहशतवादाच्या मदतीने तो घडवून आणला गेला.

पाकिस्तान काबूलमधील तालिबान राजवटीवर सीमा पलीकडून होणाऱ्या हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप करत आहे.

पाकिस्तानमध्ये अलीकडच्या वर्षांत पोलीस आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रशासनाने यासाठी ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ म्हणजेच ‘टीटीपी’ (TTP) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी तालिबानला जबाबदार धरले आहे.