बिहारमध्ये आंदोलकांवर AK-47 ने गोळीबार! ही संपूर्ण व्यवस्थाच विद्यार्थ्यांसाठी घातक; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेपरफुटीप्रकरणात देशातील विद्यार्थी आक्रमक झाले असून सरकारविरोधत आवज उठवताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये तरूण रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. मात्र पोलीस या आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत. देशभरातील विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांवर होत असलेल्या कारवाईवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत आक्रमक टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या विरोधात संपूर्ण व्यवस्थाच ‘घातक’ बनल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

आज तकच्या वृत्ताचा हवाला देत, राहुल गांधी यांनी ट्वीट करून केंद्र सरकारवर आरोप केले आहे. बिहारमध्ये शांततापूर्ण प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ‘एके-47’ (AK-47) सारख्या घातक शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. तसेच शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे (FIR) दाखल करण्यात येत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.

जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर कोणतीही FIR दाखल केली जाणार नाही आणि त्यांना तात्काळ सोडण्यात येईल, असा पंतप्रधान मोदींनी असा शब्द दिला होता. मात्र दिलेला शब्द पाळला गेला नसल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधानांच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा वापर करण्यात आला आणि आता बिहारमध्ये एके-47 चालवली जात आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार असो वा राजधानी दिल्ली प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा एकच पॅटर्न राबवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

हे सरकार पूर्णपणे खोटी असून या सरकारकडून कोणत्याही सुधारणांची अपेक्षा नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांवर कारवाई न करता त्यांच्यावर लाठीहल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा, असे देखील राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.