Ratnagiri News – रेल्वेच्या धडकेत चार दुभत्या म्हशी ठार; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान, फेन्सिंगच्या मागणीला पुन्हा जोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूर तालुक्यातील मोसम येथील सरवणकरवाडी परिसरात रेल्वेच्या धडकेत चार दुभत्या म्हशी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत संबंधित शेतकऱ्याचे सुमारे पाच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, रेल्वे मार्गालगत संरक्षक फेन्सिंग नसल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळगाव येथील एका शेतकऱ्याच्या चार दुभत्या म्हशी मोसम येथील सरवणकरवाडी परिसरात रेल्वे मार्गालगत चरण्यास गेल्या होत्या. याच वेळी भरधाव रेल्वेची धडक बसल्याने चारही म्हशी जागीच ठार झाल्या. दुभत्या जनावरांचा मृत्यू झाल्याने संबंधित शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, राजापूर तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गालगत अनेक ठिकाणी अद्यापही संरक्षक फेन्सिंग उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे जनावरे सहजपणे रेल्वे रुळांवर जात असून, अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. यापूर्वीही बैल, गायी आणि म्हशी रेल्वेच्या धडकेत दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही मिळालेली नाही. राजापूर तालुक्यात डिसेंबर महिन्यानंतर गुरे मोकाट सोडण्याची प्रथा असल्याने जनावरे चाऱ्याच्या शोधात रेल्वे मार्गालगत येतात. फेन्सिंग नसल्यामुळे ती थेट रुळांवर पोहोचतात आणि भरधाव रेल्वेच्या धडकेत बळी पडतात. त्यामुळे रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना तातडीने मजबूत संरक्षक फेन्सिंग उभारण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

रेल्वेच्या धडकेत जनावरे दगावल्यास शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळत नसल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन संपूर्ण रेल्वे मार्गालगत प्रभावी संरक्षक फेन्सिंग उभारावे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.