
वांग्याचे भरीत आणि रोटी खाल्ल्यानंतर तीन बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात घडली. पोलिसांना कोणतीही सूचना न देता किंवा शवविच्छेदन न करताच कुटुंबाने मृतदेह दफन केले. ही बाब उघडकीस आल्यानंतर स्थानिक पोलीस आणि डॉक्टरांनी गावात जाऊन दफन केलेल्या जागेची पाहणी केली. तिन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पिपोरा खुर्द गावातील बालमुकुंद कुशवाह यांच्या कन्या पूनम, मनिषा आणि चाहत यांनी शुक्रवारी रात्री जेवणात वांग्याचे भरीत आणि रोटी खाल्ली. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. यानंतर कुटुंबाने पोलिसांना घटनेची माहिती न कळवता तिन्ही मृतदेह दफन केले.
पोलिसांनी तिन्ही मतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
























































