
खोपोलीतील झेनिथ धबधबा येथे अडकलेल्या पर्यटकांना विहारी ठाकूरवाडी ग्रामस्थांनी मदत करत पाण्याच्या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढले. ग्रामस्थांनी मोठा दोर फेकून अडकलेल्या पर्यटकांची साखळी बनवत त्यांची सुटका केली.
४१ शिक्षक-कर्मचाऱ्यांची सुटका
मुसळधार पावसामुळे वसई पूर्वेतील एव्हरशाइन सिटीच्या मधुबन परिसरातील ठाकूर इंद्रासंदेवी पब्लिक स्कूल (टीआयपीएस) आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात पाणी शिरल्याने अडकलेल्या ४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने शनिवारी सकाळी सुखरूप सुटका केली.
किल्ल्यावर अडकलेले सहा पर्यटक बचावले
पालघर : जिल्ह्यातील तांदूळवाडी किल्ल्यावर अडकलेल्या सहा पर्यटकांची सफाळा पोलीस आणि बचाव पथकाने सुखरूप सुटका केली. नालासोपारा, विरार आणि डहाणू येथील चार तरुण व दोन तरुणी असे एकूण सहा पर्यटक तांदूळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते. किल्ल्यावरून परत खाली उतरत असताना मुसळधार पाऊस, दाट धुके आणि निसरड्या मार्गामुळे त्यांचा रस्ता चुकला.





























































