उशांची अभ्रे अन् स्वच्छता

आपण आपल्या शरीराच्या इतर अवयवांच्या तुलनेत आपला चेहरा आणि हात यांच्या स्वच्छतेसाठी त्यांना वारंवार धुत असतो, मात्र उशा आणि उशांची अभ्रेच बरेचदा बॅक्टेरियाने भरलेली असतात व त्यांच्यामुळे आपले नुकसान होऊ शकते. नुकत्याच झालेल्या पाहणीत असे आढळून आलंय की, आठवडाभराहून अधिक काळ धुतल्याशिवाय राहून गेलेल्या उशांच्या कव्हरवर टॉयलेट सीट्सच्या 17 हजार पट अधिक सूक्ष्मजीवजंतू (बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी) असतात.

सर्वसाधारण स्वच्छतेच्या ज्या उपाययोजनांकडे आपण दुर्लक्ष करतो व त्यातून जंतूसंसर्ग उद्भवू शकतो अशा गोष्टींकडे या अभ्यासातून लक्ष वेधण्यात आले. लहान मुले, वयोवृद्ध तसेच गंभीर आजार असलेल्या व्यक्तींसारख्या रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या लोकांच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे, अशी माहिती पहर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथील डॉ. स्मृती नासवा सिंग, कन्सल्टन्ट डर्मिटोलॉजिस्ट अँड कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि इन्फेक्श्यस डिजिज स्पेशलिस्ट डॉ. कृती सबनीस यांनी दिली.

हे सूक्ष्म जीवजंतू सहज आजारी पडणाऱया व्यक्तीच्या नाकावाटे शरीरात गेले किंवा त्वचेच्या संपका&त आले तर त्या व्यक्तीच्या त्वचेवर पुरळ, मुरमं येऊ शकतात किंवा काहींच्या बाबतीत श्वसनमार्गात जंतूसंसर्ग (न्यूमोनिया) होऊ शकतो. इतकेच नव्हे तर बिछान्यांमध्ये कालांतराने धुळीतील अॅलर्जीकारक घटक साठतात. ओलसर/दमट आणि उष्ण वातावरणामध्ये सूक्ष्म जीवजंतू वेगाने फैलावतात. शिंका, पुरळ, खाज, खोकला, नाक चोंदणे अशा अॅलर्जी समस्या उद्भवू शकतात.

काय काळजी घ्याल…

 ज्यांना खूप जास्त घाम येतो किंवा जे रात्रीचा व्यायाम करतात अशा मंडळींनी झोपण्यापूर्वी आंघोळ करावी.
 झोपण्याआधी मेकअप काढायला विसरू नये. याचा दुहेरी फायदा आहे
 एक म्हणजे तुमच्या त्वचेला मोकळा श्वास घेता येतो. मेकअपसह झोपल्यामुळे त्वचेवर येणारी मुरमं र्अीणि पुरळ यांचा प्रतिबंध होतो. दुसरा फायदा म्हणजे उशा व उशांची अभ्रे यांच्यावर बॅक्टेरियाचा संसर्ग होणे टाळले जाते.
 प्रत्येक वर्षी उशा आणि उशांचे कव्हर बदलावेत आणि बिछाना दर सात वर्षांनी तरी बदलावा
 घरात बाळ असेल तर बिछान्यावर मेणकापडासारखे आच्छादन असावे.
 बिछान्यावर खाणे किंवा पिणे टाळावे किंवा खाण्यापूर्वी बिछान्यावर एखादे प्लास्टिक पसरावे
 डेस्कवरून काम करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे शरीराची ढब नीट राखली जाईल व पाठदुखी होणार नाही हे तर झालेच, पण त्याचबरोबर बिछानाही खराब होणार नाही.
 दर काही दिवसांनी बिछान्यांवरील आवरण काढून त्यांना उन्हात आणि हवेशीर ठिकाणी ठेवा.
 बिछान्यावर काहीतर सांडल्यास बिछाना सुकविण्याचा प्रयत्न करा
 उशांची अभ्रे आणि चादरी दर आठवडय़ाला धुऊन टाका
 रात्री खूप घाम येत असेल किंवा तुम्हाला झोपताना केसांना व त्वचेला तेल लावण्याची सवय असेल तर चादरी-अभ्रे यांची स्वच्छता वरचेवर करा.
अशाप्रकारे छोटय़ा उपाययोजना केल्यास व आरोग्यदायी सवयी लावून घेतल्यास आपण एका स्वच्छ आणि जंतूपासून मुक्त वातावरणामध्ये झोपेचा अनुभव घेऊ शकू.