
राज्यसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाच्या उमेवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीर व मनमानीपणे रद्द करण्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज दादरमध्ये निवडणूक आयोग व भाजपा सरकार विरोधात तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, मोदी सरकार, फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘जब जब सरकार डरती है, पुलीस को आगे करती है’, ‘निवडणूक आयोग भाजपाची शाखा आहे’, ‘लोकशाही नाही हुकुमशाही आहे’, अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
“निवडणूक आयोग भाजपा सरकारच्या हातातले कळसुत्री बाहुली बनले असून सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत आहे. मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज रद्द करण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाही, कोणताही एफआयआर त्यांच्यावर नाही, तरिही एका खोट्या आक्षेपाची दखल घेत मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्यात आली. निवडणूक आयोग व भारतीय जनता पक्ष यांची अभद्र युती असून असे प्रकार भारतीय लोकशाही व संविधानाला अत्यंत घातक आहे. निवडणूक आयोग व भाजपाने लोकशाहीचा गळा घोटण्याचे कृत्य केले असून यामुळे निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कार्यपद्धतीचा पर्दाफाश झाला आहे. काँग्रेस पक्ष या लोकशाहीविरोधी शक्तींच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढा देत राहील”, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.





























































