
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बुधवारी असा दावा केला की, पेन्शन देण्यासाठी राखीव निधीतून (contingency fund) पैसे काढणे हे राज्याच्या ‘गंभीर आर्थिक संकटाचे’ लक्षण आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचा ‘नवशिका’ व्यक्ती असा उल्लेख केला.
राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मे, जून आणि जुलै महिन्यांच्या सामाजिक सुरक्षा पेन्शन देण्यासाठी बिहार राखीव निधीतून ३,६६२ कोटी रुपये काढण्यास मंजुरी दिली.
‘बिहारची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. नियमित अर्थसंकल्पीय तरतुदींऐवजी सरकारने पेन्शन देण्यासाठी राखीव निधीतून ३,६६२ कोटी रुपये काढण्याचा निर्णय घेतला. अनेक दशकांच्या डबल-इंजिन सरकारनंतरही परिस्थिती या पातळीवर का आली, याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे’, असे यादव यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे.
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचा ‘नवशिका’ असा उल्लेख करत आरजेडी नेत्यांनी त्यांना आवाहन केले की, त्यांनी ‘अनावश्यक मुद्द्यांवरून गाजावाजा’ करण्याऐवजी राज्याच्या या ‘भयंकर आर्थिक परिस्थिती’बाबत बिहारमधील चिंताग्रस्त जनतेशी तात्काळ संवाद साधायला हवा.
तिजोरी रिकामी असल्याने बिहारमध्ये गेल्या ४-५ महिन्यांपासून पगार आणि पेन्शन देण्यात आलेली नाही, असा दावा देखील त्यांनी केला.
यादव यांनी असा आरोप केला की, २०२३-२४ मध्ये मंजूर झालेल्या योजनांवर अद्याप काम सुरू झालेले नाही आणि २०२५ व २०२६ च्या घोषणा कोणताही विचार न करता करण्यात आल्या होत्या.
‘प्रचंड वीज कपात होत आहे. स्कॉलरशिपचे पैसे दिले जात नाहीत. स्टुडंट क्रेडिट कार्ड योजना ठप्प झाली आहे. निधीच्या कमतरतेमुळे कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुरू असलेली ‘बिहार राज्य पीक सहाय्य योजना’ देखील बंद करण्यात आली’, असे ते म्हणाले.
बिहार दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे का आणि डबल-इंजिन सरकारच्या ‘भांडवलशाही धोरणांमुळे आणि जनविरोधी निर्णयांमुळे’ आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे का, असा सवाल आरजेडी नेत्यांनी उपस्थित केला.



























































