
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात ढगफुटीमुळे मोठी आपत्ती ओढवली आहे. निचार ब्लॉकमधील कचरंग परिसरात मंगळवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या ढगफुटीमुळे कचरंग नाल्याला अचानक पूर आला. पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास आलेल्या या पुरामुळे रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सफरचंदाच्या बागांचे मोठे नुकसान झाले. पुराच्या प्रचंड वेगामुळे कचरंग परिसरातील स्थानिक रस्ता पूर्णपणे वाहून गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ढगफुटीचा फटका पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेलाही बसला आहे. जलशक्ती विभागाच्या पाइपलाइन तुटल्या असून दोन ठिकाणच्या पाण्याच्या टाक्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पुराचा सर्वाधिक फटका स्थानिक बागायतदारांना बसला आहे. नाल्यातून आलेल्या गाळ, दगड आणि कचऱ्यामुळे अनेक शेती क्षेत्रे आणि सफरचंदाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी सफरचंदाची झाडे उन्मळून पडली असून बागायतदारांना लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे वृत्त दैनिक जागरण ने दिले आहे.
प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून रस्ते दुरुस्ती आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रभावित भागात तातडीने मदतकार्य राबवण्याची आणि नुकसानग्रस्त पायाभूत सुविधा लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.


























































