’20 विद्यार्थ्यांचे जीव गेले, तरी शिक्षण मंत्री गप्प’; काँग्रेस खर्गेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात 90 पेपरफुटीच्या घटना घडल्या असून त्यामुळे कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.

खर्गे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. असे असतानाही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान पदाला चिकटून बसले असून विद्यार्थ्यांच्या आवाजाला “दहशतवादी” असे संबोधत असल्याचा आरोप त्यांनी केला.

खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. देश विसरलेला नाही की, पंतप्रधान मोदी यांनी संसदेत शेतकऱ्यांना “आंदोलनजीवी” आणि “परजीवी” अशा अपमानास्पद शब्दांत संबोधले होते, असे ते म्हणाले. तसेच सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते, अशी टीकाही त्यांनी केली. विद्यार्थ्यांचा आवाज संपूर्ण देशभर अधिक बुलंद होईल, असा दावा करत खर्गे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.