
प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन जे सत्तेवर आले त्यांनीच अयोध्या आणि राम मंदिर कसे लुटले याची ‘लुटकथा’ समोर आली आहे. राम मंदिर निर्माणासाठी छातीवर गोळ्या झेलणारे संतोष दुबे यांनी राम मंदिर लुटीचा पूर्ण पर्दाफाश करून भाजपचा मुखवटा फाडला आहे. दुबे म्हणतात, ‘राम मंदिराच्या ट्रस्टींनीच अयोध्येवर दरोडा टाकला आहे. 2002 पासून ही लूट सुरू झाली, ती थांबली नाही. सोन्या-चांदीच्या विटा लुटल्या, दानपेट्या चोरल्या, देणग्या गायब केल्या. रामाची आभूषणे चोरली. महापाप सुरू आहे.’
दुबे डोळ्यात पाणी आणून सांगतात, ‘कधी काळी प्रभू राम अयोध्येचा राजा होता. आता ‘चंपत चोर’ अयोध्येचा राजा बनला आहे आणि दुसरा ट्रस्टी अनिल मिश्रा हा लुटारूंचा सेनापती!’ रामाची अयोध्या आज पूर्णपणे चोरांच्या हाती आहे. आता भुरटे चोर पकडले जात आहेत. चोरांच्या सरदारांना सरकारचे संरक्षण आहे. अशाने श्रीराम पुन्हा वनवासात जातील, असा संताप रामसेवक दुबे यांनी व्यक्त केला.
संतोष दुबे यांनी अयोध्येतील चोरांविरुद्ध शंख
फुंकला आहे. राम मंदिराच्या लुटीविषयी देशभरातील कथावाचक, संत, महंत, राजकारण्यांनी मौन बाळगले असताना संतोष दुबे हे उघडपणे मंदिरातील दरोडेखोरांविरुद्ध रणात उतरले आहेत. पत्रकार ब्रजेश मिश्रा यांनी त्यांच्या ‘पॉडकास्ट’मध्ये संतोष दुबेंची खळबळजनक मुलाखत घेतली. त्यात अनेक बॉम्ब फुटले आहेत.
संतोष दुबे यांनी पॉडकॉस्टमध्ये या देणगीचोरीचा सविस्तर खुलासा केला. 1989 मध्ये अयोध्येत मंदिराचे शिलापूजन झाले. त्यासाठी जगभरातून सवा कोटी रामशिळा आल्या होत्या. यात 1250 रामशिळा या सोने, चांदी, हिरेमाणकांनी जडवलेल्या होत्या. या शिळा मोजताना स्वतः दुबे तिथे हजर होते. कार्यशाळेत तिहेरी सुरक्षेच्या घेऱयात या रामशिळा ठेवण्यात आल्या होत्या. 2002 मध्ये या 1250 रामशिळा तेथून गायब झाल्या. कोणताही दरवाजा तुटला नाही, कडीकोयंडे शाबूत असताना ही चोरी झाली. महंत परमहंस रामचंद्र यांनी दुबे यांना फोन करून रामाची संपूर्ण संपत्ती लुटली गेल्याची माहिती दिली. ही माहिती देताना परमहंसांना रडू कोसळले. नंतर महंत आणि दुबे यांनी अयोध्येच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली, परंतु काहीही झाले नाही. चंपत राय बन्सल हे राम मंदिर ट्रस्टचे महासचिव झाले. चंपत रायचा विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अयोध्येत शिरकाव झाला आणि त्यानंतरच रामलल्लाची लूट सुरू झाली. आधी सोन्या-चांदीच्या 1250 शिळा चोरीला गेल्या आणि ट्रस्टच्या स्थापनेनंतर काय काय चोरीला गेले, किती रामधनाची लूट झाली हे देवालाच ठाऊक, असे दुबे म्हणाले. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे, पण एवढे बेशरम सरकार मी पाहिले नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
शहीद कारसेवक विस्मरणात गेले
राम मंदिरासाठी आम्ही सर्वस्वाचा होम केला. माझ्या घरादारावर बुलडोझर चालवला गेला. मला चार गोळय़ा लागल्या. सतरा हाडे तुटली. तीन वेळा ‘रासुका’ लागला. रामाचे काम केले, बाबरी पाडली, हा माझा अपराध होता. पण चंपत रायसारख्यांना त्याचे मोल काय कळणार! 17 कारसेवक शहीद झाले आंदोलनात. कुणी विचारले त्यांना? जरा त्यांचे घर जाऊन पहा एकदा, मग कळेल. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपने आपापले महाल बांधले. रामाच्या नावावर सत्ता मिळवली आणि त्याच रामाच्या मंदिरात चोरी केली, असे हे कृतघ्न आहेत, असा आरोप संतोष दुबे यांनी केला.
नृपेंद्र मिश्रा पलटले
देणगी घोटाळा उघड झाल्यानंतर नृपेंद्र मिश्रा यांनी मी बांधकामाचा प्रमुख, मला काहीही माहिती नाही, म्हणत कानावर हात ठेवले. तीन दिवसांनी हेच मिश्रा दिल्ली दरबारी हजर झाले आणि त्यांनी 18 वाहिन्यांना मुलाखती दिल्या व चोरीचा डंका वाजवला. तीन दिवसांत असे काय घडले, असा प्रश्न दुबे यांनी उपस्थित केला.
चोरांचा सेनापती
मंदिराच्या आंदोलनात डॉ. अनिल मिश्रा हे कुठेही नव्हते. पण संघाशी संबंध असल्यामुळे थेट मंदिर ट्रस्टवर जाऊन बसले. मंदिरासाठी वाळू, लोखंड, संगमरवर मागवण्यात आले, त्यात कुणाचे भले झाले? डॉ. मिश्रांचे घर कुणी बांधून दिले? मंदिर बांधकामावर अभियंता असलेल्या दीनानाथ वर्मा यांनी सगळा भंडाफोड केला आहे. डॉ. मिश्रा म्हणजे चोरांचा सेनापती! चोरीचे हिस्से-वाटे करताना कलह झाला आणि हे सगळे प्रकरण चव्हाटय़ावर आले, असे ते म्हणाले.
‘चारित्र्यहीन’ विकास नको
अयोध्येतील बहुतांश मंदिरांत, मठांमध्ये सध्या ‘होम स्टे’ बनवण्यात आले आहेत. तासाभरासाठी जोडप्यांना येथे खोल्या भाडय़ाने देण्यात येतात. या होम स्टेमध्ये काय चालते, हे सगळय़ा अयोध्येला माहिती आहे. कुणाच्या सांगण्यावरून हे होम स्टे करण्यात आले… चंपत राय, डॉ. अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांच्या! पंचतारांकित, सप्ततारांकित हॉटेल्स आले. पण अयोध्येची रामधून मात्र येथून गायब झाली, याला जबाबदार कोण? असा ‘चारित्र्यहीन’ विकास असेल तर आमची अयोध्या कुटीच बरी, असे संतोष दुबे म्हणाले.
परिक्रमा पथासाठी मंदिरांचा बळी
मंदिर परिसराचा विकास करण्याच्या नावाखाली तेथील अनेक मंदिरे पाडण्यात आली. परिक्रमा पथासाठी रामफकिरे मंदिर पाडण्यात आले. या ठिकाणी वनवासात निघालेल्या प्रभू रामचंद्राला वल्कले परिधान करण्यासाठी दिली होती. राजेशाही वस्त्र्ाांचा त्याग करून येथेच रामाने वल्कले परिधान केली, म्हणून या मंदिराचे नाव रामफकिरे! चंपत राय यांनी हे मंदिरच चार कोटीत स्वतःच्या नावावर खरेदी केले. अयोध्येच्या न्यायालयात हे प्रकरण गेले. रातोरात मंदिर पाडण्यात आले. परिक्रमा पथात येणाऱया सगळ्या मंदिरांचा बळी देण्यात आला. पण खजुरवाली मशीद मात्र तशीच ठेवण्यात आली. त्यासाठी चक्क रामपथ वाकडा करण्यात आला. मंदिराशेजारी असलेल्या जागेचेही असेच. ही जागा चंपत राय यांनी 23 कोटींत खरेदी केली. रामनिवास मंदिराच्या कित्येक एकर जमिनीवर चंपत राय यांनी कब्जा केला. चंपत राय म्हणजे गँगस्टर असल्याचा आरोप संतोष दुबे यांनी केला.
चंपत रायच्या मागे महाशक्ती!
राम मंदिर ट्रस्टमध्ये 15 सदस्य आहेत. परंतु चलती फक्त चंपत राय, डॉ. अनिल मिश्रा, गोपाल राव आणि गोविंद गिरी यांचीच आहे. चंपत राय हे या परिसराचे अनभिषिक्त राजे आहेत. बाकीचे सदस्य नावालाच आहेत. गोपाल राव तर ट्रस्टचा सदस्यही नाही, परंतु मंदिर परिसराचा तो हुकूमशहाच आहे. विनय कटियार हा राममंदिर आंदोलनातला एक प्रमुख चेहरा. परंतु या गोपाल रावने कटियार यांना रामदर्शनासाठी चक्क रांगेत उभे केले, ते केवळ आडवाणी गटाचे असल्यामुळे! मंदिर ट्रस्टच्या नावाखाली पंतप्रधानांनी चंपत राय आणि गोपाल राव यांच्यासारखे द्वारपाल नेमले, यांची पात्रता तीच असल्याचा हल्ला संतोष दुबे यांनी केला. चंपत राय, मिश्रा, राव, गोविंद गिरी यांना हात लावण्याची कोणाची हिंमत नाही. कारण त्यांच्यामागे ‘महाशक्ती’ असल्याचा आरोप दुबे यांनी केला.
मूळ अयोध्यावासीयांना विस्थापित केले!
- राम मंदिर बनले, आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण मंदिराच्या आडून अयोध्येवर गुजरात्यांनी केव्हा कब्जा केला हे कळलेच नाही. सध्या अर्ध्या अयोध्येवर गुजरात्यांचा कब्जा असल्याचा आरोप दुबेंनी केला.
- गुजरात्यांसाठी मूळ अयोध्यावासीयांना विस्थापित केले. दहशतच एवढी आहे की घरादारावर बुलडोझर चालण्याच्या भीतीपोटी अयोध्येत आता कुणी बोलतच नाही, अशी खंत दुबे यांनी व्यक्त केली.
कारवाईचे घोडे कुठे अडले?
पंतप्रधान हिंदू आहे, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री हिंदू आहेत. राज्यपाल हिंदू आहेत. सचिव, गृहसचिव हिंदू. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हिंदू आहेत. चोरी करणारे हिंदू आहेत. चौकशी करणारेही हिंदूच आहेत. चौकशीची मागणी करणारेही हिंदू आहेत. मग कारवाईचे घोडे अडले कुठे? लोक म्हणतात, चंपत रायच्या मागे-पुढे कुणी नाही, तो का चोरी करेल? मग, फुलनदेवीने डाके घातले, डाकू छबीलराम, लाखन ठाकूर डाकाच टाकत होते, त्यांच्या मागे-पुढे कोण होते? त्यांनी कुणासाठी डाके घातले? इथेही तेच झाले. मंदिराच्या ट्रस्टींनीच चोऱया केल्या आणि मालकाच्या चरणी रामधन वाहिले, असा आरोप संतोष दुबे यांनी केला.
चोरांनीच स्वतःची चौकशी केली
मंदिरात चोरी कुणी केली सगळय़ांना माहीत आहे. पण चंपत राय हुकूमशहा असल्यामुळे कोणी बोलायला धजावत नाही. ट्रस्टच्या चौकडीने चोरी केली आणि या चोरांनीच चौकशीसाठी ‘एसआयटी’ नेमली. चोरांनीच छापे टाकले. पैसे जप्त केले. 8 जणांना तुरुंगातही पाठवले. काय दहशत आहे चंपत रायची. दिल्ली, नागपूरवालेही चळाचळा कापतात. जगाला बौद्धिकाचे डोस पाजणारे संघप्रमुख या चोरांना कधी संघाबाहेर करणार, असा सवाल दुबे यांनी केला.
माझ्यामुळेच मंदिर झाले म्हणणाऱ्यांनी चोरीचेही श्रेय घ्यावे!
माझ्यामुळेच राम मंदिराचा निकाल आला. माझ्यामुळेच राम मंदिर झाले, असे जे म्हणतात आणि राम मंदिराचे उद्घाटन ज्यांनी केले, ध्वजारोहण ज्यांनी केले त्यांनी आता राम मंदिरात झालेल्या देणगी चोरीचेही श्रेय घेतले पाहिजे, असा हल्ला संतोष दुबे यांनी चढवला. चौकशीच्या नावाखाली भुरटे चोर पकडलेत, दरोडेखोर अजूनही मंदिराच्या आवारात राजरोस फिरत आहेत, असा संतोष दुबे यांचा आरोप आहे.
प्रभू रामचंद्रांचा रंग बदलला
राम मंदिराचे निर्माण झाले आणि आम्हाला आयुष्याचे सार्थक झाल्याची अनुभूती आली. मात्र, एका गोष्टीची खंत वाटते. मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेली मूर्ती खरेच रामल्लांची वाटते का? प्रभू रामचंद्र श्यामल वर्णाचे होते, असे वर्णन पोथ्या-पुराणांमधून येते. कबीरदास, सूरदासांनी प्रभू रामचंद्राच्या सौंदर्याचे वर्णन केलेले अनेक दोहे आहेत. मात्र, भाजप सरकारने अयोध्येत बसवलेले हे रामलल्ला चक्क कृष्णवर्णाचे बनवलेत. शनिदेवाचीच ती मूर्ती वाटते. केवळ दक्षिणेकडील राज्यांच्या मतांसाठी या मूर्तीला दाक्षिणात्य रूप देण्यात आले, असा आरोप संतोष दुबे यांनी केला.
संघवाले ‘जय श्रीराम’ म्हणत नव्हते
राम मंदिराचे आंदोलन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ‘नमस्तेजी’ म्हणण्याचा प्रघात होता. आंदोलन सुरू झाले अन् ‘जय श्रीराम’चा बोलबाला झाला. हे गोपाल राव संघाचेच. ‘भाईसाब’ म्हणतात त्यांना! गोपाल राव म्हणजे मंदिरातला हुकूमशहाच असल्याचा आरोप संतोष दुबे यांनी केला.
चोरांचे राज्य!
1. सगळेच हिंदू; मग कारवाई करा
2. अयोध्येवर गुजरात्यांचा कब्जा
3. रत्नजडित रामशिळा गायब
4. खरे चोर वाचवले जात आहेत!
5. मोदी, चोरीचेही श्रेय घ्या!
6. चंपत राय अयोध्येचा नवा राजा




























































