सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून हटवले; पोलिसांनी उचलून रुग्णालयात नेलं, अभिजीत दिपके घरात नजरकैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 21 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांचे पथक आंदोलनस्थळी पोहोचले आणि पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उचलून थेट सफदरगंज रुग्णालयात नेले. यामुळे आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. तर दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी घरात नजरकैद करण्यात आल्याचा आरोप सीजेपीने केला आहे.

नीट पेपरफुटी, परीक्षांमधील घोटाळ्यांचा निषेध आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांचे वजन 20 दिवसांमध्ये 9.5 किलोग्रॅमनी घटले आहे.  त्यांचा रक्तदाब आणि रक्तशर्करेची पातळीदेखील घटली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असून उपोषण सुरूच राहिल्यास त्यांचे अवयव निकामी होऊ शकतात, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मी 20 जुलैपर्यंत जिवंत राहणार आहे. 20 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीचा संसदेवर मोर्चा असून लोकशाहीच्या मंदिरात मी म्हणणे मांडणार असल्याचे म्हणत वांगचुक यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी सातच्या सुमारास दिल्ली पोलीस, दंगल नियंत्रण पथकाने जंतरमंतर येथे जाऊन सोनम वांगचुक यांना थेट उचलून रुग्णालयात नेले. नवी दिल्ली पोलीस उपायुक्तांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

सामना अग्रलेख – वांगचुक यांच्या लढ्याचे महत्त्व!

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना रुग्णालयात नेण्याच्या प्रक्रियेदरम्यान, काही आंदोलकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे थोडा गोंधळ निर्माण झाला. मात्र पोलिसांनी संयम राखला आणि संपूर्ण कारवाई सुरक्षितपणे पार पाडली. जंतर-मंतर येथील आंदोलकांना शांतता राखण्याचे आणि शांततेने जागा रिकामी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.