देशात दहशतीच्या आणि अहंकाराच्या शेवटाला सुरुवात झालीय, रोहित पवारांची एक्सवर पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली, मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात तब्बल 26 दिवस पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्यानंतर अखेर प्रधान यांनी राजीनामा दिला. तरुणाईच्या बुलंद आवाजाला न्याय मिळाला. या विजयाचा प्रचंड जल्लोष दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात करण्यात आला. वंदे मातरम्… भारत माता की जय… छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवान जय शिवाजी अशी गगनभेदी घोषणा देत जेन झी मैदानाजवळ दाखल झाले. हातात तिरंगा, सरकारविरोधातील पोस्टर घेऊन तरुणाईचे वादळ शिवतीर्थावर धडकले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युवाशक्तीला संबोधित केले. यावेळी मंचावर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, आमदार मिलिंद नार्वेकर, ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार उपस्थित होते. हा तिरंगा विजय जल्लोष झाल्यानंतर रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांनी गेल्या बारा वर्षांत पहिल्यांदाच हुकूमशाही वृत्तीला झुकवण्याचा जो इतिहास सुवर्णाक्षरात लिहिला त्याचा मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्कवर आज विजयोत्सव साजरा करण्यात आला. लाखो तरुणाईच्या उपस्थितीत झालेल्या या जल्लोषाचा मलाही एक साक्षीदार होण्याची संधी मिळाली, असे रोहित पवार म्हणाले.

LIVE Blog – लढलो आणि जिंकलो! शिवतीर्थावर जेन-झींची धडक, तिरंग्याचा जल्लोष; उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची उपस्थिती

कालपासून देशात दहशतीच्या आणि अहंकाराच्या शेवटाला सुरवात झाली असून येत्या काळात ही पूर्णपणे नष्ट होऊन खऱ्या अर्थाने लोकशाही नांदेल… आणि याची जनक असेल देशभरातील तरुणाई…! असेही रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले. यासोबत त्यांनी तिरंगा विजय जल्लोषात सहभागी झाले त्याचे काही फोटोही शेअर केले.