नोकऱ्या मिळाल्या नाही तर सिंहासन डगमगेल; राहुल गांधी यांचा भाजपला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपला धक्का देत पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक ट्विट करत भाजप आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे. नोकऱ्या नाही मिळाल्या तर सिंहासन डगमगेल, अशा इशारा राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नोकरी मिळाली नाही, तर सिंहासन हादरून जाईल. कोटा आणि डेहराडूननंतर, आता विद्यार्थ्यांचा आवाज प्रयागराजपर्यंत पोहोचत आहे. हे ते शहर आहे जिथे लाखो तरुण अनेक वर्षांपासून तयारी करत आहेत. अर्ज भरत आहेत, फी भरत आहेत आणि वाट पाहत आहेत.

प्रश्नपत्रिका फुटल्याने त्यांचे भवितव्य हिरावले गेले आहे. रखडलेल्या भरतीने त्यांचे भविष्य अंधारात आहे. काही दिवसांपूर्वीच, याच विद्यार्थ्यांवर दिल्लीत लाठीचार्ज करण्यात आला आणि पेलेट्स गन चालवण्यात आली. त्यांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, आम्ही त्यांचा आवाज उठवत राहू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ. आता कोणतीही सबब चालणार नाही जबाबदारी स्वीकारा, नाहीतर खुर्ची सोडा. ८ ऑगस्ट प्रयागराजमध्ये भेटूया, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची ताकद देशाला दिसून आली. आता विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. येत्या 8 ऑगस्ट रोजी राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. रोजगाराच्या मुद्द्यावर ते आंदोलन करणार असून या मध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. त्याचवेळी ‘जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा’ असा इशारा त्यांनी उत्तर प्रदेशातील भाजप सरकार आणि केंद्र सरकारला दिला आहे.