
चीनकडून लागू करण्यात येत असलेल्या नव्या सायबर सुरक्षा, इंटरनेट आणि सीमा नियंत्रण नियमांमुळे चीनमध्ये प्रवास करणाऱ्या किंवा तिथे राहणाऱ्या तैवानच्या नागरिकांसाठी मोठे कायदेशीर आणि सुरक्षेचे धोके निर्माण होऊ शकतात, असा गंभीर इशारा तैवानने दिला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून लागू होणाऱ्या या नव्या नियमांमुळे तैवानच्या नागरिकांसाठी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तैपेई येथील नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीत आयोजित एका विशेष चर्चासत्रात बोलताना तैवानच्या मेनलँड अफेअर्स कौन्सिलचे उपमंत्री शेन यू-चुंग यांनी ही भीती व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, पुढील वर्षी होणाऱ्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या २१ व्या राष्ट्रीय काँग्रेसपूर्वी नागरी समाजावरील आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी चीनकडून हे जाचक नियम आणले जात आहेत. या नव्या नियमांतील भाषा अतिशय संदिग्ध असून यामुळे चीनच्या कनिष्ठ स्तरावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनाही अमर्याद अधिकार मिळतील. पक्षाच्या राजकीय निर्देशांचे पालन करत असल्याचे दाखवण्यासाठी हे अधिकारी नियमांचा अत्यंत कठोरपणे वापर करू शकतात, ज्यामुळे चिनी भूमीवर असणाऱ्या तैवानी नागरिकांना अनिश्चितता आणि विनाकारण कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
तसेच या नव्या कायद्यांच्या माध्यमातून चीन आपल्या सीमांच्या बाहेरही नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असून हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील दडपशाहीचा भाग असल्याचा थेट आरोप तैवानने केला आहे. अशा कारवायांना मदत करणे हा गुन्हेगारी स्वरूपाचा अपराध ठरवणारा नवा कायदा आणण्याच्या विचारात तैवान सरकार असून, एका सर्वेक्षणात तब्बल ७६ टक्क्यांहून अधिक तैवानी नागरिकांनी याला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर तैवानच्या नागरिकांनी चीनचा प्रवास करण्यापूर्वी संभाव्य धोक्यांचा काळजीपूर्वक आढावा घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच चीन, हाँगकाँग आणि मकाऊ येथे प्रवास करताना प्रशासनाच्या विशेष प्रणालीवर नोंदणी करावी, जेणेकरून कोणालाही ताब्यात घेतल्यास किंवा संपर्क तुटल्यास सरकारला तातडीने मदत पोहोचवणे शक्य होईल, अशी सूचनाही देण्यात आली आहे.




























































